कणखर बोलणं, कठोर स्वभाव, शिस्त म्हणजे शिस्त… तरीही वेळ आली की, डोळ्यांतील अश्रू लपवत लेकरांसाठी जगातलं सगळं सुख पायी आणून ठेवण्याची ताकद ठेवतो तो बाप असतो. तुमच्याही आयुष्यात असाच एक बापमाणूस असणार हे नक्की. बाबा कळायला थोडा कठीण पण एकदा कळाला की, तो कसं बरं सगळं करत असेल? असे हजारो, लाखो प्रश्न मनात उपस्थित होतात. मात्र त्याच बापाचं जेव्हा छत्र हरपतं तेव्हा खरी किंमत कळते. याचा अनुभव ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुन म्हणजेच अमित भानुशालीने खऱ्या आयुष्यात घेतला आहे. अमित आज इथवर त्याच्या वडिलांमुळेच पोहोचला. याबाबत त्याने पहिल्यांदाच अगदी उडपणे भाष्य केलं. (Aamit bhanushali talk about father)
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमात अमितने हजेरी लावली होती. यावेळी बरीच धमाल-मस्ती झाली. पंढरीनाथ कांबळे, विशाखा सुभेदार, निक्की तांबोळी, शिवानी सुर्वे, प्रियांका तेंडुकर असे अनेक कलाकारांनी कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी अमितने त्याच्या बाबांबद्दल बोलताना सगळ्यांनाच रडवलं. बाबांविषयी बोलताना तो ढसाढसा रडू लागला. तसेच स्ट्रगलच्या दिवसांमध्ये वडिलांनी कशाप्रकारे साथ दिली? याविषयी त्याने सांगितलं.
अमित म्हणाला, “ऑडिशन देत देत दिड वर्ष फिरलो. कधीच काम मिळालं नाही. जेव्हा हरलो तेव्हा जॉब हातात घेतला. जॉईनिंग लेटर बाबांच्या हातात दिलं. तेव्हा तो एकमेव व्यक्ती होता त्याने माझं जॉइनिंग लेटर फाडलं. मला म्हणाले तू जा बाप अजूनही आहे. तुझं स्वप्न पूर्ण कर. थोडंफार यश मिळालं. पण आज हेच सगळं जगायला ते नाहीत”. अमितने एवढं सांगितलं आणि त्याच्या अश्रूंचा बांध फुटला.
अमितचं बोलणं ऐकताना सहकलाकारांनाही अश्रू अनावर झाले. सेटवरील प्रत्येक व्यक्ती अगदी ढसाढसा रडला. अमित सहकलाकारांना मिठी मारुन रडला. अमितचे बाबा आता त्यांच्याबरोबर नाहीत. पण वेळोवेळी त्याला वडिलांची कमी नक्कीच जाणवते. अमितचं बोलणं ऐकल्यानंतर त्याचं त्याच्या वडिलांवर किती प्रेम आहे हे दिसून आलं. तसेच स्ट्रगलच्या काळात पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले वडील अमितच्या पाठीशी आयुष्यभर उभे आहेत हे नक्की.