Bollywood Singer Troll : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार त्यांच्या कारकिर्दीसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही सतत चर्चेत असतात. त्यापैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे लोकप्रिय गायिका कनिका कपूर. वयाच्या ४३व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न करत तिने आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला आणि यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली. ‘बेबी डॉल’, ‘लवली’ आणि ‘चिट्टियां कलाइयां’सारख्या सुपरहिट गाण्यांमुळे कनिका कपूर घराघरात पोहोचली. तिचा वेगळा आवाज आणि स्टाईल यामुळे तिने संगीतविश्वात स्वतःची खास ओळख निर्माण केली.
मात्र व्यावसायिक यशाच्या मागे तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले. अतिशय लहान वयात, अवघ्या १८व्या वर्षी, कनिकाने पहिलं लग्न केलं होतं. त्यानंतर काही वर्षांनी तिच्या वैवाहिक आयुष्यात मतभेद निर्माण झाले आणि २०१२ साली ती पतीपासून विभक्त झाली. तिच्या पहिल्या लग्नातून तिला आयना, समारा आणि युवराज अशी तीन मुलं आहेत. घटस्फोटानंतर तिने मुलांची जबाबदारी सांभाळत स्वतःच्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं आणि पुन्हा उभी राहिली. घटस्फोटानंतर अनेक वर्षांनी कनिकाच्या आयुष्यात उद्योजक गौतम हाथीरमानी यांची एंट्री झाली. दोघांची मैत्री तब्बल १५ वर्षांची होती. २०१४ साली गौतम यांनी तिला पहिल्यांदा लग्नाची मागणी घातली होती. मात्र त्यावेळी कनिकाने ती गोष्ट गंमत समजून दुर्लक्ष केलं.
नंतर २०२० मध्ये पुन्हा एकदा त्यांनी प्रस्ताव मांडला आणि अखेर २०२२ साली दोघांनी युकेमध्ये जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यानंतर लंडनमध्ये खास रिसेप्शनचे आयोजनही करण्यात आले. दुसऱ्या लग्नामुळे काहींनी तिला ट्रोल केलं, तरीही कनिकाने नकारात्मक प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करत स्वतःच्या आनंदाला प्राधान्य दिलं. आज ती तिच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगताना दिसते. करिअर आणि वैयक्तिक आयुष्य यामधील संतुलन राखत, संकटांवर मात करत पुन्हा नव्याने उभं राहणं हीच कनिका कपूरची खरी ओळख आहे.
आणखी वाचा – सलमान खानचे वडील रुगालयात दाखल; आयसीयूमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती समोर; चाहत्यांत चिंतेचे वातावरण





