मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गश्मीर महाजनीचं नाव आवर्जुन घेतलं जातं. गश्मीरने अधिकाधिक मेहनत करत चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. सिनेरसिकांचा हा लाडका अभिनेता गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. काही आठवड्यांपूर्वी गश्मीरचे वडील व ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर गश्मीरला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. काही दिवसांसाठी त्याने सोशल मीडियापासून दूर राहण्याचं ठरवलं. आता त्याने पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे.
वडिलांच्या निधनानंतर गश्मीरला सोशल मीडियाद्वारे बरंच ट्रोल करण्यात आलं. विविध प्रकारच्या टीका त्याच्यावर करण्यात आल्या. वडिलांची तुला काळजी नाही का?, वडिलांच्या जवळ राहत नव्हता का? असे अनेक प्रश्न त्याला विचारण्यात आले. शिवाय या दुःखाच्या काळात त्याला अनेक नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागला. मात्र आता तो या सगळ्यामधून बाहेर पडत आहे. दरम्यान गश्मीरने सोशल मीडियावर वडिलांच्या निधनानंतर खास पोस्ट शेअर केली आहे.
गश्मीरने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. फोटो शेअर करत गश्मीर म्हणाला, “हास्य. कठीण प्रसंगांमध्येही चेहऱ्यावर हास्य ठेवा. हास्यच उत्तम कमबॅक असू शकतं. मी रात्री आभाळाकडे पाहिलं, पण चंद्र काळ्या ढगांमध्ये लपला होता. मी हसलो आणि ढगांमधून माझ्यावर पावसाच्या थेंबाचा वर्षाव झाला”.
“जेव्हा गडद अंधार असतो तेव्हा एका स्मित हास्यामुळे बराच फरक पडू शकतो”. गश्मीरने लिहिलेली पोस्ट अगदी मनाला भावणारी आहे. वडिलांच्या निधनानंतर तो या दुःखामधून सावरत आहे. गश्मीरने पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी विविध कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. तसेच त्याचं पुन्हा एकदा सोशल मीडियावर स्वागत केलं आहे. तू लवकर या सगळ्यामधून बाहेर पड, कायम हसत राहा अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.