लग्न, काही वर्ष एकत्र राहणं आणि त्यानंतर घटस्फोट हे आता बी-टाऊनमध्ये अगदी सहज घडताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये इंडस्ट्रीतील घटस्फोटाच्या घटना बऱ्याच वाढल्या असल्याचं चित्र दिसलं. नातं, लग्न याबाबत काही कलाकार अगदी उघडपणे भाष्य करतात. यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री अरुणा इराणीदेखील आहेत. अरुणा त्यांच्या खासगी आयुष्याबाबत बऱ्याचदा स्पष्टपणे बोलताना दिसतात. आताही त्यांनी लग्न, नाती, मुल न होऊ देण्याचा निर्णय याबाबत भाष्य केलं. त्यांनी आई न होण्याचा निर्णय का घेतला नाही? याविषयी उघडपणे सांगितलं. (Aruna Irani talk about marriage)
अरुणा सुप्रसिद्ध कॉमेडियन महमूद यांच्या प्रेमात होत्या. मात्र महमूद यांचं लग्न झालं होतं. त्यांच्या पत्नीला अरुणा यांच्याबाबत कळताच त्यांना हे नातं नको होतं. महमूद यांनी अरुणा यांच्याबरोबर काम करु नये अशी पत्नीची इच्छा होती. महमूद यांनी आपल्याशी लग्न करावं अशी अरुणा यांची इच्छा होती. मात्र तसं काहीचं घडलं नाही. परिणामी अरुणा व महमूद यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला.
महमदू यांच्याबरोबरचं नातं संपलं. त्यानंतर अरुणा व सुप्रसिद्ध दिग्दर्शक कुकू कोहली यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली. कुकू यांचंही आधीच लग्न झालं होतं. मात्र तरीही अरुणा यांच्याशी त्यांनी १९९०मध्ये लग्न केलं. पुन्हा लग्न झालेल्या व्यक्तीवरच तुम्ही प्रेम कसं केलं? असा प्रश्न नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अरुणा यांना विचारण्यात आला. तेव्हा त्या म्हणाल्या, “कधी कधी माणूस एकटाच पडतो. मग अशा परिस्थिती दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर त्याचं जमतं. प्रेम होतं. अशावेळी फक्त त्या वेळेचं सुख दिसतं. मात्र भविष्यातील दुःख मात्र दिसत नाही”.
कुकू यांना सोडून दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याचाही अरुणा यांनी विचार केला. कुकू त्यांच्या कुटुंबाबरोबर सुखी राहावे म्हणून त्यांनी हा विचार केला होता. मात्र कुकू यांनीच अरुणा यांना स्वतःपासून लांब जाऊ दिलं नाही. कुकू यांच्याबरोबर लग्न झाल्यानंतर आई न होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. याचविषयी त्या म्हणाल्या, “जर मी आई होण्याचा निर्णय घेतला असता तरी मला घरी बसावं लागलं असतं. घरातील नोकराला मुल सांभाळायला द्यायचं या मताची मी नव्हते. मुल नसूनही मी खूश आहे. माझ्या मुलांनी समाजाचं बोलणं ऐकावं, एकटेपणा सहन करावा, त्रास सहन करावा असं मला अजिबात वाटत नव्हतं”. अरुणा यांनी अगदी खुलेपणाने त्यांचे विचार मांडले.





