अध्यात्मिक मार्गाची निवड करण्याचा निर्णय आजवर काही सेलिब्रिटींनी घेतला. अगदी उघडपणे याबाबत त्यांनी संवादही साधला. विराट कोहली, अनुष्का शर्मा याचं ताजं उदाहरण आहेत. वृंदावन येथील प्रेमानंद महाराजांच्या भेटीला हे सेलिब्रिटी जोडपं गेलं होतं. कित्येक सेलिब्रिटी मंडळी प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला जातात. सुप्रसिद्ध अभिनेता पारस छाब्रा व करण खंडेलवाल प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला गेले होते. या भेटीदरम्यान त्यांनी प्रेमानंद महाराजांशी संवाद साधला. त्यांना काही प्रश्न विचारले. यावर महाराजांनीही अगदी योग्य शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे. (Celebrity visit to premanand maharaj)
पारसने प्रेमानंद महाराजांशी संवाद साधला. तो म्हणाला, “मी खूप निराश असायचो. कित्येक वर्ष मी घरातच राहिलो. मी तुम्ही दिलेला सल्ला ऐकला आणि राधा रानी यांच्या नावाचा जप सुरु केला. तुमचा सल्ला ऐकून माझी आईही वृंदावनला आली. आता मला थोडीफार प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर मी वृंदावनमध्ये एक घरही खरेदी केलं. अध्यात्मिक मार्गाकडे मी नव्हतो तेव्हा खूप दुःखी असायचो. डिप्रेशनचाही सामना केला. ३ ते ४ वर्ष घरातच राहिलो. मला असं वाटत होतं की, आता मी मरणार. मला कॅन्सर झाला आहे असं सतत वाटायचं. खूप विचार करायचो. नकारात्मक गोष्टींमध्ये मी अडकलो होतो. पण आता पूर्णपणे ठिक आहे”.
पारसनंतर करणनेही त्याच्या समस्या सांगण्यास सुरुवात केली. करण म्हणाला, “अजूनही मी पूर्णपणे सगळ्या संकटांमधून बाहेर आलेलो नाही. काळ्या जादूच्या प्रभावाखाली मी आहे”. यावर प्रेमानंद महाराजांनी लगेचच उत्तर दिलं. ते म्हणाले, “नाही. तुझ्यावर कोणतीच काळी जादू नाही. असं असतं तर तू इथे येणं शक्यच नव्हतं. काळी जादू सारखी कोणती गोष्ट नाहीच आहे. कोणीतरी तुला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. बस्स इतकंच आहे”.
पुढे प्रेमानंद महाराज म्हणाले, “तू आता माझं ऐक. तुला कोणीच काही शाप दिला नाही. भूत-प्रेत सारख्या कोणत्याच गोष्टी नाहीत. असंच रिकामा बसू नकोस. काहीतरी करत राहा. रिकामं डोकं म्हणजे शैतानाचं घर असतं. कोणीच तुझ्यावर कोणत्याही प्रकारची जादू केलेली नाही. ना काळी ना पिवळी. तू जर या सगळ्यामध्ये अडकलास तर तुला पूर्णपणे उद्धवस्त करुन ठेवतील. ते फक्त तुला लुटायला बसले आहेत”. प्रेमानंद महाराजांनी त्याच्या शंकेचं योग्य पद्धतीने निरसन केलं.





