अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे संपूर्ण देशालाच मोठा धक्का बसला. या अपघातात २५० पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. कोणी आपली मुलगी, मुलगा, आई-वडील तर कोणी संपूर्ण कुटुंबच गमावलं. आजही या वेदना ताज्या आहेत. या संपूर्ण घटनेबाबत सगळ्याच स्थरांमधून बोललं गेलं. कलाकार मंडळींनीही दुःख व्यक्त केलं. आता अलका कुबल यांनीही याबाबत आपलं मत मांडलं आहे. त्यांना ही घटना अधिक जवळची वाटली. यामागचं कारण म्हणजे त्यांची मुलगी आणि जावई दोघंही पायलट म्हणून काम करतात. अलका या संपूर्ण प्रकरणाकडे कशाप्रकारे पाहतात? याबाबत त्यांनी भाष्य केलं आहे. (Alka Kubal on Ahmedabad Plane Crash)
ITSMAJJA च्या ठाकुर विचारणार या कार्यक्रमात अलका यांनी हजेरी लावली होती. तेव्हा अहमदाबात विमान दुर्घटनेबाबत त्यांनी आपलं मत मांडलं. अलका म्हणाल्या, “आताची ही घटना घडली त्याने अस्वस्थ व्हायला तर झालंच. अपघात, देवदर्शनाला जातानाही बसचा अनेकदा अपघात होतो, युद्ध होतं अशा अनेक घटनांमुळे अस्वस्थ तर होतंच. या सगळ्या गोष्टी मनाला कुठेतरी लागतात. आताही विमान अपघातात २४२ जणांचा मृत्यू, त्यात क्रू, दोन पायलट गेले”.
आणखी वाचा – लेकाला मांडीवर घेत गाणं गाण्यात कार्तिकी गायकवाड दंग, रिहर्सलसाठी स्टेजवरच मुलाला घेऊन आली अन्…; Video समोर
“माझी मुलगी पायलट आहे म्हणून स्वार्थीपणाने मी काही म्हणणार नाही. पण एक म्हणेन की, नशिबात जे लिहिलेलं असतं ते कुठेच जात नाही. तिची जबाबदारीची ड्युटी आहे. म्हणूनच तर त्यांच्या खूप परीक्षा असतात. सहा सहा महिन्यांनीही त्यांच्या कायतरी तपासण्या, परीक्षा होतात. त्यांचं अपडेट होणंही फार गरजेचं असतं. त्यांचे मध्ये मध्ये क्लासेसही असतात. आधी ती गो एअरला होती. ती कंपनी बंद झाल्यानंतर एक वर्ष एअर इंडियाला होती. आता ती इंडिगोमध्ये आहे. माझा जावयही इंडिगोलाच पायलट आहे. आमच्या घरात दोन दोन पायलट आहेत. अपघातात गेलेला एक पायलट हा माझ्या जावयाच्या मित्राचा मित्र होता. तेव्हा माझा जावई खूप निराश झाला होता. माझी मुलगी काही कामानिमित्त दिल्लीला होती. तेव्हा मला माझी मुलगी म्हणाली, आई हे सगळं बघून अस्वस्थ व्हायला होत आहे”.
आणखी वाचा – Video : रस्त्यांवर पाणीच पाणी, रिक्षामधून शूटसाठी पोहोचली जुई गडकरी, व्हिडीओद्वारे दाखवली परिस्थिती
“कारण त्यांच्या ओळखीमधीलच क्रू वगैरे कोणी ना कोणी असतं. आपल्या क्षेत्रातही काही अपघात होतात. सगळ्या क्षेत्रात काही ना काही होत असतं. म्हणून मला असं वाटतं की, जे व्हायचं असेल ते काही चुकत नाही. आपण आपल्या घरात आलो तेव्हाच सुरक्षित असं म्हणायला हरकत नाही. घरी आलो आणि हृदयविकाराचा झटका आला तर काय करणार?. कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतं. फक्त जबाबदारीने आपापली कर्तव्य पार पाडली पाहिजेत. जोपर्यंत आपण जगतो तोपर्यंत माणसं जोडावीत. कोणाला दुखावू नये. जे आयुष्य आहे ते आनंदाने जगावं”.





