‘ठरलं तर मग’ मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. मालिकेत अर्जुन व चैतन्यवर साक्षीमुळे खूप मोठं संकट ओढावलं आहे. साक्षी पत्रकार परिषद घेत अर्जुन व चैतन्यवर वात्सल्य आश्रमाप्रकरणी प्रेमाचं नाटक करुन फसवणूक केल्याचे आरोप करते. यामुळे आता अर्जुन व चैतन्य यांची सनदही रद्द होण्याची शक्यता वाढली आहे. साक्षीच्या सांगण्यावरुन काही गुंड अर्जुनच्या ऑफिसवर जाऊन तमाशे करतात. यावेळी सायली अर्जुनच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. (Tharal Tar Mag Promo)
सायलीने पुन्हा एकदा अर्जुनच्या पाठीशी उभी राहत बायको म्हणून कर्तव्य पार पाडलं आहे. सायली व अर्जुन यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं असतं, आणि ही गोष्ट त्यांनी घरच्यांपासून लपवून ठेवलेली असते. सुरुवातीला केवळ मित्र म्हणून सायली व अर्जुन एकमेकांसह राहत असतात. मात्र कालांतराने ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. अद्याप सायली व अर्जुन यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली एकमेकांसमोर दिलेली नाही, त्यामुळे हे दोघे केव्हा प्रेमाची कबुली देणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
अशातच मालिकेच्या एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये वटपौर्णिमा स्पेशल भाग पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अर्जुन मनातल्या मनात सात जन्म सायलीसारखी पत्नी मिळावी यासाठी उपवास करायच ठरवते. तर सायलीही सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून मनोमनी प्रार्थना करते. वटपौर्णिमेनिमित्त सायलीचा पारंपरिक लूकही प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
कल्पना, अस्मिता व सायलीबरोबर अर्जुनदेखील वडाची पूजा करायला जातो. वडाला फेरे घेताना अचानक पाऊस पडतो. त्यावेळी अर्जुन सायलीच्या डोक्यावर केळीचं पान धरतो. दोघेही वडाला फेरे घेताना दिसत आहेत. वडाला फेऱ्या मारताना दोघेही मनातल्या मनात आपल्याला सात जन्म हाच नवरा आणि हीच बायको मिळावी अशी प्रार्थना करतात. प्रेक्षकही हा भाग पाहण्यास उत्सुक असल्याचं समोर आलं आहे.