सिनेजगतातील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांनी एक काळ विशेष गाजवला. बऱ्याच हिट चित्रपटांमधून रवींद्र यांनी त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली. रवींद्र यांच्या अचानक आलेल्या मृत्यूच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. अनेकांनी रवींद्र यांच्या मृत्यूच्या बातमीने हळहळ व्यक्त केली. रवींद्र हे सिनेसृष्टीतील देखण्या अभिनेत्यांपैकी एक होते. रवींद्र यांच्या सौंदर्यावर अनेक चाहते घायाळ होते. अशा या देखण्या कलाकाराबाबतचा एक किस्सा रवींद्र यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी सांगितला आहे. (Ravindra Mahajani Incident)
रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी त्यांच्या चौथा अंक या पुस्तकात त्यांच्या आयुष्याबाबतचे अनेक किस्से सांगितले आहेत. यांत त्यांनी रवींद्र यांच्यावर एका अभिनेत्रीचं प्रेम होतं तो किस्सा सांगत म्हटलं आहे की, “मी वानखेडे स्टेडियमला नोकरी करीत होते त्यामुळे मी घरी नसायचे. तेव्हा रवीबरोबर एका चित्रपटात काम केलेली अभिनेत्री त्याच्यावर फिदा होती. ती माझ्या घरी फोन करायची. घरातला नोकर फोन घेत असे. त्याच्याकडून रवी कोणत्या शहरात शूटिंग करत आहे, याची ती माहिती घ्यायची. त्याप्रमाणे ती त्याच्या हॉटेलमधे जायची. हे रवीला कळले की, तो मलाच फोन करायचा, “हिला कुणी सांगितले मी इथे आहे म्हणून?”, मग म्हणायचा, “आता मी काय करु? ती माझ्या रूममधे जाऊन बसली असणार.” कधी तो तिला टाळण्यात यशस्वी व्हायचा. कधी रुममधे गेल्यावर कळायचे. ती मग तिथे त्याच्याबरोबरच राहायची.”
यापुढे त्यांनी सांगितलं आहे की, “एकदा मी ऑफिसला गेलेले असताना घरी सासूबाई होत्या. रवी मुंबईतच स्टुडिओमधे गेला होता. ही नटी अचानक घरी आली. तिने आमच्या घरातला बार उघडला आणि हॉलमधे पीत बसली. ती इतकी प्याली की, तिथेच लवंडली. मी ऑफिस सुटल्यावर घरी आले, तर सासूबाईंनी मला ती कशी पसरली आहे ते दाखवले. थोड्या वेळानं रवीही आला.”
पुढे त्या म्हणाल्या, “सासूबाई बाहेर असल्याने आम्ही तिला उठवून आत नेले. ती रवीला म्हणाली, “मला तुझ्याशी लग्न करायचं आहे.” मला म्हणाली, “आपण दोघीही याच्याबरोबर एकत्र राहू.” शेवटी कसेबसे तिला आम्ही धरुन गाडीत घातले. ह.रा. महाजनी मार्गावरच गाडी असताना गाडी थोडी स्लो झाली आणि तिने गाडीतून बाहेर उडी मारली आणि गाडीसमोर जाऊन झोपली. तिला रवीला सोडून जायचे नव्हते. मग पुन्हा आम्ही दोघांनी तिला उचलून कसंबसं गाडीत कोंबलं आणि माहिमला तिच्या आईकडे सोडलं. त्यानंतर मात्र ती कधी पुन्हा घरी आली नाही.”