‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरात पोहोचणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. ती सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत आहे. यापूर्वी अपूर्वाने ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारली होती. तिने साकारलं हे पात्र प्रेक्षकांच्या बरंच पसंतीस पडलं. त्यानंतर आता ती ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून सावनी हे पात्र साकारत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून बरीच चर्चेत आहे. या मालिकेतील पात्रांबाबत काही नेटकऱ्यांमध्ये नाराजी असलेली दिसून आली. नुकतेच याबाबत एका मुलाखतीत अपूर्वाने वक्तव्य केलं आहे. (apurva nemlekar told on misfits for the roles)
‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका प्रदर्शित झाल्यापासून विविध कारणांसाठी चर्चेत आहे. कधी ही मालिका नेटकऱ्यांकडून ट्रोल होताना दिसते तर कधी या मालिकेचं कौतुकही होताना दिसतं. पहिल्याच आठवड्यात टीआरपीच्या शर्यतीत तर ही मालिका अव्वल स्थानावर होती. पण या मालिकेतील मुख्य पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा व तेजश्री यांना या भूमिकांसाठी बरंच ट्रोल केलं जात आहे. प्रेक्षकांना आम्ही दोघं अभिनेता राज हंचनाळेपेक्षा वयाने मोठे दिसत असल्याचं वाटतं.
यावर अपूर्वाने ई-टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे. अपूर्वाला विचारण्यात आलं की, त्यांना काही नेटकरी ट्रोल करत आहेत की ती या भूमिकेसाठी चुकीची निवड आहे. त्यावर अपुर्वाने उत्तर दिताना सांगितलं, “हो, मी काही टिप्पणी वाचल्यात. ज्यात आम्हा तिघांना एकत्र पाहून काही नेटकरी आमचं कौतुक करतात. तर काहींना आम्ही या भूमिकेसाठी चुकीचे वाटतो. कारण मी व तेजश्री या पात्रांमध्ये राजपेक्षा वयाने मोठे वाटतो, असं लोकांचं म्हणणं आहे. पण लोकांना माहित नाही की आम्हा तिघांचे वय सारखेच आहे. आम्ही एकाच वयाचे आहोत. आम्ही तिघं या भूमिकांसाठी सारखीच मेहनत घेत आहोत.”.
आणखी वाचा – मुलीचं नाव काय ठेवणार? याबाबत राहुल वैद्यचा खुलासा, म्हणाला, “नावं काढली आहेत पण…”
अपूर्वा पुढे म्हणाली, “मला विश्वास आहे की लोक लवकरच आम्हा तिघांच्या वयाबाबत व दिसण्याबाबतचा दृष्टिकोन बदलतील. लोक अनेकदा अनेक गोष्टींबद्दल बोलतात. पण मी अशी व्यक्ती आहे, जी नेहमी मेहनत व कामावर लक्ष केंद्रीत करते. असे काही लोक आहेत ज्यांना आमची मालिकेतील भूमिका आवडत नाही किंवा आम्ही त्या भूमिकेसाठी त्यांना चुकीचे वाटते पण मला खात्री आहे की यापुढे ते आमच्याबद्दलचा हा विचार व दृष्टिकोन बदलतील. आम्ही ते आमच्या कामातून सिद्ध करून दाखवू”, अशा शब्दात तिने टिका करणाऱ्यांना अधिक मेहनत घेऊन उत्तर देऊ असं सांगितलं.