लहान पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ या मालिकेला दिवसेंदिवस वेगळे वळण पाहायला मिळत आहे. मालिका सध्या खूप रंजक वळणावर पोहोचली आहे. यामुळे ही मालिका अधिकच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेमधील अर्जुन व सायली यांच्यामध्ये असणारी केमेस्ट्रीदेखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. यातील सायली हे पात्र विशेषकरुन खूप गाजले आहे. ही भूमिका अभिनेत्री जुई गडकरीने साकारले असून तिला या भुमिकेमुळे विशेष ओळख मिळाली आहे. (jui gadkari on marriage)
जुईची या मालिकेमध्ये खूप सोज्वळ भूमिका आहे. ती अभिनयाबरोबरच सोशल मिडियावर अधिक सक्रिय असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशीदेखील संवाद साधत असते. त्यामुळे तीच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमी उत्सुक असतात. अशातच आता तिच्याबद्दल एक अपडेट समोर आली आहे. तिने नुकताच ‘इट्स मज्जा’ या चॅनलशी संवाद साधला आहे. यामध्ये तिने होणारा नवरा कसा असावा याबद्दल तिने भाष्य केले आहे.
सध्या या मालिकेमध्ये जानकीच्या लग्नाची धूम पाहायला मिळाली. त्यामुळे सेवरील लग्न, वातावरण याबद्दल चर्चा झाली. त्यावेळी तीच्या घरी लग्नाची तयारी कशी सुरु असते याबद्दलदेखील सांगितले आहे. तसेच “सोशल मीडियावर चाहत्यांशी संपर्क साधताना त्यांच्याकडून कोणते प्रश्न विचारण्यात येतात?” असे जुईला विचारले गेले. त्यावर ती म्हणाली की, “चाहत्यांशी संवाद साधताना मी लग्न कधी करणार? असा प्रश्न सातत्याने विचारला जातो”.
त्यानंतर “लग्नाबाबतचं मत काय आहे?”, असेही तिला विचारले गेले. त्यावर तिने उत्तर दिले की, “प्रत्येकाने लग्न केले पाहिजे. माझा हिंदू विवाहसंस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे तसेच प्रेमावरही पूर्ण विश्वास आहे. मी स्वतः एकत्रित कुटुंबपद्धतीमध्ये वाढले आहे. त्यामुळे संस्कारदेखील तसेच झाले आहेत. एक चांगलं कुटुंब एकत्रितपणे राहतात. त्यामुळे जे लग्नाचे आहेत त्यांनी लग्न कराच. तसेच प्रत्येक वेळी आपल्याच मनाचं झालं पाहिजे असं काही नाही. थोडं आपल्या पद्धतीने थोडं समोरच्याच्या पद्धतीने केलं तर संसार खूप सुखाचा होतो”.
त्यानंतर “मुलगा नक्की कसा हवा?” असे तिला विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली की, “मुलगा साधा,सरळ , निर्व्यसनी हवा. माझ्या काही खूप साऱ्या अपेक्षा नाहीत. तसेच शुद्ध शाकाहारी असावा. देवाचं सगळं करणारा असावा. अध्यात्मिकरित्या आमचे विचार जुळले पाहिजेत. तसेच आमच्यामध्ये विचारदेखील सारखे असले पाहिजेत”.
‘ठरलं तर मग’ मालिकेआधी जुई छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकत आली. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतील मुख्य भूमिकेमुळे जुईच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.