राज्यभरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. काही अंशी शहरात काम करणाऱ्या प्रत्येकाचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. कामासाठी करावा लागणारा प्रवास प्रचंड पावसामुळे त्रासदायक ठरत आहे. शिवाय रेल्वेही उशीराने धावत असल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे. मुंबई सारख्या शहरात तर रस्त्यांची अवस्था जैसे थे आहे. पावसामुळे ट्राफिक आणि रस्त्यांवरील खड्डे यामुळे अनेकांना गैरसोय होत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटी मंडळींचंही असंच काहीसं आहे. कलाकार मंडळींनाही नेहमीच्या शूटसाठी प्रवास करत असताना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ अभिनेत्री रुपाली भोसलेने शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे. (rupali bhosale video on road bad condition)
घोडबंदर रोड, त्यामार्गाने जायचे रस्ते याविषयी कलाकार नेहमीच तक्रार करतात. कधी कधी तर तीन तीन तास प्रवास करुन सेटवर पोहोचावं लागतं. यामागे खराब रस्ते, ट्राफिक अशी अनेक कारणं आहेत. पाऊस पडल्यानंतर तर त्याहूनही परिस्थिती अगदी वाईट. रुपालीलाही या गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे. याबाबत तिने व्हिडीओ शेअर केला आहे. रुपाली गाडी चालवत आहे. पण गाडी चालवत असताना तिने रस्त्यांची अवस्था दाखवली आहे.
रुपालीने व्हिडीओद्वारे दाखवलेली अवस्था खूपच भयावह आहे. रुपाली म्हणाली, “काय अवस्था आहे?. किती वर्ष झाली हा असा प्रवास करायचा?. आई कुठे काय करते ही मालिका करत असताना जवळपास ५ वर्ष मी विरारहून इथे यायचे. तेव्हाही अशीच परिस्थिती होती. आजसुद्धा तसंच आहे. रात्रभर शूट करुन सकाळी ५.३०ला घरी निघाले. या घोडबंदर रोडला आधी ट्राफिक नंतर हा सुंदर रस्ता. १२ ते १४ तास शूट आणि त्यानंतर दोन तास हा असा प्रवास. हे सगळं कधी नीट होणार?”. रुपालीने तिच्या पोस्टद्वारे प्रशासनालाच संतप्त सवाल केला आहे.
रुपालीने व्हिडीओ शेअर करत एकनाथ शिंदे, देवेद्र फडणवीस, नितीन गडकरी यांना टॅग केलं आहे. तसेच रुपालीच्या या व्हिडीओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. मनसे जिंकवा महाराष्ट्र वाचवा, काहीच बोलायचं नाही कारण महायुती सरकार ते आपलं सरकार, अच्छे दिन बाकी काही नाही हो, असं वाटतं रथच चालवत आहोत, याला २०१४ नंतरचा विकास म्हणतात अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.





