Ketaki Chitale controversial Statement : सध्या राज्यात मराठी-हिंदी असा वाद सुरु आहे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावीच लागेल, अशी मनसे, ठाकरे गट तसेच इतर पक्षांचीही भूमिका आहे. राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयामुळेही राज्यात भाषेविरोधात वाद पेटला होता. मराठी-हिंदी भाषेच्या वादावर अनेक कलाकार मंडळींनी आपापली मत मांडली. अशातच या प्रकरणाच्या विरोधात जात अभिनेत्री केतकी चितळे हिने वादग्रस्त विधान केलं आहे. मराठी न बोलल्यास भोकं पडणार आहेत का? असा सवाल तिने थेट सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केला आहे. तर केतकीची ही पोस्ट पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.
केतकीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबद्दल टिप्पणी केली आहे. अभिनेत्रीने म्हटलं, “आपण अभिजात दर्जाबद्दल बोलूया. अभिजात हा संस्कृत शब्द आहे, जसं मी सांगितलं की अभिजात म्हणजे, स्वतंत्र असायला पाहिजे. दुसऱ्या भाषेवर आधारित नसली पाहिजे. हा जो काही क्रायटेरिया होता तो २०२४ मध्ये काढण्यात आला. मराठी, बंगाली आणि आसामी या भाषांनासुद्धा अभिजात दर्जा मिळावा यासाठी हा क्रायटेरिया काढण्यात आला. पण वैयक्तिकरित्या, मी याच्या विरोधात आहे. जर तुम्हाला अभिजात दर्जा द्यायचा असेल तर तो सगळ्याच भाषांना द्या,” असं केतकी चितळे म्हणाली.
आणखी वाचा – “मी वडिलांची भूमिका नाही बजावत”, सावत्र मुलासह असं आहे अनुपम खेर यांचं नातं, स्वतःच केला खुलासा, म्हणाले…
पुढे केतकीने हिंदी व उर्दू भाषेला अभिजात दर्जा नसण्याबद्दल विधान करत म्हटलं, “माझ्या एका जवळच्या व्यक्तीने मला असं म्हटलं की हिंदी आणि उर्दूलासुद्धा अभिजात दर्जा नाही. त्यामुळे त्यांनीसुद्धा भांडायला पाहिजे. मला असं वाटलं की फक्त दर्जा हवा म्हणून ते का भांडतील? यातून फक्त तुमची असुरक्षितता दिसून येते. दर्जा मिळाला, पण त्यामुळे काय झालं? आम्हाला दर्जा पाहिजे, दर्जा पाहिजे, असं म्हणून तुम्ही तुमची असुरक्षितता दाखवत आहात”, असं केतकी म्हणाली.
पुढे ती म्हणाली, “मराठीत बोल-मराठीत बोल, मराठी येत नाही. अरे.. तो बोलेल नाहीतर नाही बोलणार, त्याने काय मराठी भाषेचं नुकसान होतंय का? भोकं पडतायत का? नाही ना. तुम्ही तुमची स्वतःची असुरक्षितता दाखवताय. त्याने काय फरक पडतो? कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही”.





