नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने विक्रमी कमाई करत बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे आणि अजूनही हा चित्रपट अजूनही चांगलाच गाजत आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती आणि आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेला पात्र ठरत आहे. बॉबी देओल, रणबीर कपूर, रश्मिका मंदाना व अनिल कपूर यांच्या दमदार भूमिका असलेल्या चित्रपटात मराठी कलाकारांनीदेखील आपली एक वेगळी छाप उमटवली आहे. अशातच या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणरे उपेंद्र लिमये यांनी या चित्रपटाला नकार दिला होता. पण कालांतराने त्यांनी ही भूमिका स्वीकारल्याचे सांगितले. (Upendra Limaye’s First Interview)
‘इट्स मज्जा’च्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत स्वतः अभिनेत्याने याबाबत खुलासा केला आहे. यावेळी उपेंद्र असं म्हणाले की, “संदीप रेड्डी वांगा यांचा सहाय्यक दिग्दर्शक जितेंद्र भोसलेने मला या चित्रपटातील भूमिकेबद्दल विचारण्यासाठी फोन केला होता. पण संपूर्ण चित्रपटात एकच सीन असल्यामुळे मी यासाठी आधी त्याला नकार दिला होता. दरम्यान तो सहाय्यक दिग्दर्शक या भूमिकेसाठी मला वारंवार संपर्क करत होता. पण मीही त्याला एकच सीन करण्यासाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट सांगतले होते. यावर त्याने हा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा असल्याचे सांगितले आणि ‘अर्जुन रेड्डी’ हा माझा आवडता चित्रपट होता. माझ्या कॉलेजच्या दिवसांत मी या चित्रपटाने प्रभावित झालो होतो. ‘अर्जुन रेड्डी’ हा संदीप यांचा पहिला चित्रपट असूनदेखील त्यांनी इतका कमाल चित्रपट केला होता. यामुळे मी त्या दिग्दर्शकावर प्रभावित झालो होतो. त्यामुळे मला त्यांना भेटण्याची इच्छा निर्माण झाली. म्हणून मी एके दिवशी त्यांना भेटायला गेलो आणि भेटायला जातानाच मी असं ठरवून गेलो होतो की, आपल्या आवडत्या दिग्दर्शकाला भेटायला मिळत आहे तर त्याला फक्त भेटुयात आणि आपण या भूमिकेसाठी नकार देऊ.”
यापुढे ते असं म्हणाले की, “त्यामुळे ठरल्याप्रमाणे मी एकेदिवशी त्यांना भेटायला गेलो. तेव्हा त्यांनी मला चित्रपटाचे कथानक सांगितले. त्याचबरोबर कथानकातील त्या अॅक्शन सीनबद्दल आणि एकूणच माझ्या भुमिकेबद्दलही माहिती दिली. तेव्हा मी तो पूर्ण सीन ऐकल्यानंतर चित्रपटातील ती भूमिका करण्यासाठी तयार झालो. पण त्यातही मी काही ठराविक दृश्ये करण्यासाठी तयार नव्हतो. यावर त्यांनी मला काळजी करू नये असं म्हणत चित्रपटाची पटकथाही तशा पद्धतीने लिहिण्यात आले असल्याचे सांगितले. पण या चित्रपटातली ही भूमिका फक्त मीच करावी यावर ते ठाम होते.”
आणखी वाचा – चेन्नईमधील पुरात २४ तास अडकला आमिर खान, बोटीच्या सहाय्याने अभिनेत्याला बाहेर काढलं अन्…; फोटो व्हायरल
पुढे मी त्यांना तुम्ही मला एखादं दुसरा सीन द्या ज्यावर मी तयारी करू शकेन असं म्हटलं. मग एक-दोन दिवसांनी मला त्यांच्याकडून एक सीन आला ज्यात मला माझ्या पद्धतीने भर घालून तो सीन करायला सांगितला. कारण दिग्दर्शकाला चित्रपटातील ते पात्र मराठीच हवे होते. त्यामुळे त्या पात्राला मराठीपण व प्रादेशिक रूप येण्यासाठी मी त्यात माझ्या पध्दतीने ‘चांगभलं, लायकीत राहायचं, आईच्या गावात’ असे रूढ अर्थाने प्रचलित असलेले मराठी शब्द वापरले. दरम्यान शूटिंग होण्याअगोदर आम्ही त्या सीनवर व माझ्या लूकवर बरीच चर्चा केली होती. आणि मग सरतेशेवटी आम्ही तो सीन उत्तमपणे शूट केला आणि हा अनुभव अतिशय सुंदर आणि आश्चर्यचकित करणारा होता.”
यापुढे उपेंद्र यांनी दिग्दर्शक व अभिनेता रणबीर कपूरच्या कामाचेही कौतुक केले. दरम्यान, एका आर्मी ऑफिसरच्या मुख्य भूमिकेतून उपेंद्रने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. त्याचबरोबर त्याच्या ‘चांगभलं’ या डायलॉगने तो चित्रपटगृहातील प्रेक्षकांची दाद मिळवतो. त्यामुळे चित्रपटात अनिल कपूर, रणबीर कपूर, बॉबी देओलसारखे बॉलिवूडमधील मोठे स्टार्स असले तरी मराठमोळे उपेंद्र लिमये चांगलेच भाव खाऊन गेले आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.