तीव्र अल निनोच्या परिणामामुळे बंगालच्या उपसागरात मिचाँग चक्रीवादळाने थैमान घातलं आहे. मिचाँग चक्रीवादळामुळं चेन्नई शहरातील विविध भागात सध्या तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे चेन्नईमध्ये ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुराचा ट्रेन, बस, विमान या वाहतूक सेवांवर वाईट परिणाम झाला आहे. सध्या या सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे साहजिकच जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच आणखी एक बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानला या पुराचा फटका बसला आहे. गेले २४ तास अभिनेता या पुरात अडकला असून त्याच्याबरोबर अभिनेता विष्णु विशालदेखील आहे.
नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये अग्निशमन व बचाव विभाग आमिर खानला वाचवताना दिसत आहेत.आमिरबरोबर अभिनेता विष्णू विशालही या वादळात अडकला होता. या दोघांनाही आता २४ तासांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. स्वत: विष्णू विशालने आपल्या एक्स (ट्विटर) अकाउंटवर काही फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. आमिर खान व बचाव विभागाबरोबरचे काही फोटोस शेअर करत त्याने असं लिहिलं आहे की, “आमच्यासारख्या अडकलेल्या लोकांना मदत केल्याबद्दल अग्निशमन व बचाव विभागाचे आभार आणि सातत्याने काम करणाऱ्या सर्व प्रशासकीय लोकांचेही आभार.”
Thanks to the fire and rescue department in helping people like us who are stranded
— VISHNU VISHAL – VV (@TheVishnuVishal) December 5, 2023
Rescue operations have started in karapakkam..
Saw 3 boats functioning already
Great work by TN govt in such testing times
Thanks to all the administrative people who are working relentlessly https://t.co/QdoW7zaBuI pic.twitter.com/qyzX73kHmc
आणखी वाचा – दिनेश फडणीस यांच्या निधनानंतर CID फेम कलाकारांना मोठा धक्का, शिवाजी साटमही भावुक, म्हणाले, “साधा, नम्र आणि…”
याबरोबरच अभिनेत्याने त्याचे काही फोटो शेअर करत “माझ्या घरात पाणी शिरत आहे आणि करपक्कममध्ये पाण्याची पातळी खूपच वाढत आहे. पावसामुळे इथे फोनला सिग्नल नाही आहे. घरच्या छतावर एका विशिष्ट ठिकाणी नेटवर्क येत आहे. याच्याद्वारे मी मदतीसाठी आवाहन केले आहे. त्यामुळे मला आणि इथे अडकलेल्या अनेकांना काही मदत मिळू शकेल अशी आशा करुया” असंही म्हटलं आहे.
दरम्यान, आमिर खान यांच्या पुरात अडकल्याच्या बातम्यांमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण पाहायला मिळाले होते. पण नुकत्याच आलेल्या या फोटोमधून तो सुखरूप असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान, ‘लाल सिंह चड्ढा’ नंतर आमीरचा एकही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. त्यामुळे त्याने अभिनयापासून ब्रेक घेतले असल्याचे म्हटले जात आहे. पण चाहते त्याच्या नवीन प्रोजेक्टसाठी आतुर आहेत. त्यामुळे आगामी काळात आमिरचा कोणता नवीन चित्रपट येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.