आजवर अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने आजवर त्याच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. संकर्षणने मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत प्रेक्षकांची मनं जिंकली. आजवर संकर्षणने लेखन, दिग्दर्शन, अभिनय व कविता करत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आहे. अभिनयाशिवाय तो एक उत्तम लेखक, कवी असल्याचे आपण जाणतोच. सोशल मीडियावरही संकर्षण बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच संकर्षणने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Sankarshan Karhade Shared Political Based Poem)
संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेत एक सुंदर अशी कविता सादर केली आहे. “नमस्कार. सध्याच्या राजकिय परिस्थीतीवर काही लिहिण्याचा मनापासून प्रयत्न केला आणि प्रेक्षकांनी काल तो प्रयत्न अगदी मनापासून स्विकारला. तुम्हीही ऐका, पहा आणि मनापासून सांगा की तुमच्याही मनांत हेच आहे का?”, असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
कविता सादर करताना संकर्षण म्हणाला, “एका कुटुंबातील आजोबा हे दुःख सांगत आहेत”.
सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं, खात्यापित्या घरचं तरी दुखी मला वाटलं
माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं, मीच जवळून जाऊन म्हटलं, का हो काय झालं,
तुमच्यापैकी कोणाला काही झालंय का?, तिन्हीसांजेला कुणी गेलंय का?
कुटुंबप्रमुख आजोबा उठले, सोडत मोठा श्वास, डोळे तांबडे लाल बहुतेक रडले होते ढसाढसा
ऐक तुला सांगतो म्हणाले, असं झालंय, आम्हा सगळ्या कुटुंबाचं एक-एक मत वाया गेलंय,
आता हा माझा नातू बघ नुसता जीवाला घोर आहे, सभेला जायचं, घोषणा द्यायचं याला फारच जोर आहे.
बरं, एवढं करून याने मतही दिलं, तरीही याच भागलं नाही, पण याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेजवर लागलं नाही. मग ती सभा, त्या घोषणा, ती गर्दी, तो आवाज त्याच पुढे काय झालं, असं करत याच मत तीन-चारवेळा वाया गेलं.
आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे. ना करिअर मे ग्रोथ है, ना जिंदगी मे वाईब है, अरे बाबा वारशाने फक्त पैसा येतो, कर्तृत्व कोणी आणत नाही. भारतभर चालूं तुझी पावलं दमली, पण हात काय चालत नाही. मग ते धोतर, ती काठी, ते आडनांव त्याचं काय झालं, आणि असं करत याचंही मत बरंच वाया गेलं.
आता माझ्या मुलाला राजकारणातलं खूप कळतं, याचं मनं गेली अनेकवर्ष घडाळ्यातील वेळ पाळत,
चुकली वेळ, झाला खेळ वेगळंच संधान साधलं, एका साहेबांचं घड्याळ दुसऱ्या साहेबाने स्वतःच्या हातावर बांधलं. मग नवा साहेब, घड्याळ तेच पुन्हा वेळ पाळू का?, का जुन्या साहेबांबरोबर राहून तुतारीने आवाज काढू का? मग ते वय, तो अनुभव, ती निष्ठा, तो परिवार त्याचं पुढे काय झालं असं करत माझ्या मुलाचं मत वाया गेलं.
आता ही माझी सून अस्मिता, तशी धाडसीच म्हणायची. जरा कुणी नडलं की घरातला बाण काढायची.
मी तिला कितीदा म्हणलं, बाण जपून वापरायचा असतो, एकदा हातातून सुटला की परत येत नसतो गं.
मग जी मनातही नसायची ती भीती खरी झाली, अहो शब्दांनी आग लागायची तिथे हातात मशाल आली.
मग तो बाण, तो बाणा, ते सैनिक यांच्यात असं काय झालं, पण असं करत माझ्या सूनेचं मत वाया गेलं.
आता ही माझी बायको, ही घडवेल तेच घरात घडतं. नाव हिचं लक्ष्मी हिला कमळ फार आवडतं
मी लगेच पुढे विचारलं माझी उत्सुकतातर दिसली असेल, अहो कमळ जिथल्या तिथेच आहे मग यांचं मत वाया गेलं नसेल. आजोबा म्हणाले ती दुःखात नाही तशी, पण तिच्या मनात तळमळ आहे. कारण ज्यांच्या विरोधात मत दिलं त्यांच्या हातात आता कमळ आहे.
अहो मग ते सत्ताधारी, ते विरोधक, हे प्रामाणिक, ते बाजारी यांच्यात असं काय झालं, त्यामुळे आता असं वाटतंय की माझ्या बायकोच एक मत वाया गेलं.
त्यामुळे पुढाऱ्यांनो तुम्ही कितीही पक्ष बदलून म्हणालात की, हाच माझा पक्ष आहे. तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, की, आमचं तुमच्यावर लक्ष आहे. त्यामुळे इथून पुढे तरी दिलेल्या मताची किंमत ठेवा, आणि मतदारांनो मत करा आणि लोकशाही जिवंत ठेवा.