अरबाज खान हे नाव सध्या बी-टाऊनमध्ये अधिक चर्चेचा विषय ठरलं आहे. बऱ्याचदा खासगी आयुष्यामुळेच तो टॉक ऑफ द टाऊन ठरतो. २०२३मध्ये त्याने शूरासह लग्न केलं. मलायका अरोराबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर त्याचं हे दुसरं लग्न आहे. विशेष म्हणजे २० वर्षांनी लहान शूराबरोबर त्याने संसार थाटला. गेल्या काही दिवसांपासून शूरा गरोदर असल्याच्या विविध चर्चा रंगत आहेत. कॅमेऱ्यासमोरही तिचं वाढलेलं पोट दिसलं. आता याच चर्चांवर अरबाजने शिक्कामोर्तब केला आहे. ५७व्या वर्षी अरबाज बाबा होणार असल्याचं त्याने अखेरीस जाहिर केलं. त्याचबरोबरीने दुसऱ्यांदा प्रेम करणं हा काही गुन्हा नाही असं अरबाजचं म्हणणं आहे. (Arbaaz khan on love life)
इटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अरबाजने अनेक खुलासे केले. पुन्हा प्रेम होतं का? याबाबत अरबाज बोलला. तो म्हणाला, “तुम्ही जर एकदा प्रेमात पडलात तर तुम्ही दुसऱ्यांदाही प्रेम करुच शकता. कारण तुमच्या मनातच प्रेम असतं. ते तुम्ही समोरच्या व्यक्तीवर व्यक्त करु शकता. एकदा तुम्हाला प्रेम झालं तर तुम्ही पुन्हा कधीच प्रेम करु शकत नाही या मताचा मी नाही. असं का असलं पाहिजे?. पुढे तुमचं सगळं आयुष्य आहे”.
“सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं. आणि ती निघून गेल्यानंतर पुढचं आयुष्य फक्त एका आशेवर जगत राहणार. असं फक्त चिंतेत राहण्यात अर्थ आहे का?. तुम्ही जगण्याची आशा ठेवली पाहिजे. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर जर वाट्याला प्रेम आलं तर त्यामध्ये खूश असलं पाहिजे. एका व्यक्तीकडूनच तुम्हाला प्रेम मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण असं होत नसेल आणि दुसरी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत असेल तर त्याचं स्वागत करा”.
“कोणत्याही व्यक्तीवर प्रेम करणं अपराध नाही. चुकीचं काम करणं, व्यक्तीचा राग करणं ही मोठी समस्या आहे. कोणावर प्रेम करणं ही समस्या नसली पाहिजे. प्रेमात पडण्यासाठी एक काय तर दुसरी संधीही प्रत्येकाला मिळायला हवी. दुसऱ्यांदा प्रेम होणं यामध्ये चुकीचं काहीच नाही”. अरबाजने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये त्याच्या मते प्रेम म्हणजे काय? हे सांगितलं.





