यंदा २ मेपासून केदारनाथ धाम यात्रेला सुरुवात झाली आहे. हजारो भाविक केदारनाथचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत. अशातच अमृता खानविलकर व प्राजक्ता माळी दोघीही केदारनाथ यात्रेला गेल्या होत्या. यावेळी अमृता व प्राजक्ताने मिळून बरीच धमाल-मस्ती केली. त्यांना विविध अनुभवही आले. अमृतानेही फोटो व व्हिडीओ शेअर करत केदारनाथचं दर्शन झाल्यानंतर आलेला अनुभव शेअर केला. मात्र केदारनाथहून परतल्यानंतर अमृता आजारी पडली आहे. याचबाबत तिने आता इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये ती झोपलेली दिसत आहे. तसेच हाताला IV लावलेली आहे. (amruta khanvilkar sickness after kedarnath trip)
अमृताने व्हिडीओद्वारे तिच्या आजारपणाबाबत सांगितलं. ती म्हणाली, “हॅलो, नमस्कार. तर मी काल केदारनाथहून परत आले आहे. आज मला हे झालं आहे. (हाताला सलाइनसाठी लावलेली IV दाखवली). मला बरं वाटत नाहीये. गेले दोन ते तीन दिवसांपासून मला त्रास होत आहे. पण डोलो गोळी खाऊन मी काम चालवत होते. केदारनाथला जाऊ इच्छिणाऱ्यांना मी हे सांगते की, समुद्राच्या उंचीपासून ११ हजार फुटावर हे देवस्थान आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराला समजण्याची गरज आहे. तुम्ही तिथे जाणार असाल तर तिथल्या वातावरणाची आधी तुमच्या शरीराला सवय करुन घ्या. कारण माझ्या शरीराला तिथलं वातावरण पटकन सहन झालं नाही”.
“जेव्हा मी खाली उतरत होते तेव्हा हालत खराब झाली. शेवटच्या चार किलोमीटरवर तर माझ्या पायाचे लचकेच पडले होते. अंगदुखी वगैरे आता कमी झालं आहे. पण मला Mountain sickness बहुतेक झाला आहे. तुम्हीही तिथे जाण्याचा प्लॅन करत असाल तर सगळी औषधं घेऊन जा, ORS घेऊन जा. घाईगडबडीमध्ये ही ट्रीप करायला जाऊ नका. तिथे पोचल्यानंतर शांतपणे एक दिवस त्याठिकाणी घालवा. तिथे फिरा, कॉफी प्या. दुसऱ्या दिवशी मग दर्शन घ्या”.
पुढे अमृता म्हणाली, “दर्शनानंतर तिथे थांबा आणि नंतरच खाली उतरा. आम्ही नशिबवान आहोत की, आम्हाला पाऊस लागला नाही, कुठलीच दगदग झाली नाही. पण तिथलं वातावरण वेगळंच आहे. समुद्रापासून इतक्या उंचीवर जाणं आणि तिथे गेल्यानंतर आपल्यासाठी ते अशक्य असतं. मी तिथे जाण्यापूर्वी एक आठवडा तरी ५ ते ६ किलोमीटर चढ चढत होते. पण तिथे जाऊन वातावरण कधी बदलेल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही”.

“केदारनाथचा संपूर्ण व्हिडीओ मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. ज्या गोष्टी मला कठीण वाटल्या, ज्या ज्या ठिकाणी आम्ही लकी ठरलो ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. केदारनाथला गेलेल्या सगळ्यांनीच त्यांच्या त्यांचा अनुभव शेअर केला पाहिजे. त्यातून माहिती मिळते. माझी ही ट्रीप जितकी आव्हानात्मक होती तितकीच सुंदरही होती. तिथे गेल्यानंतर तुमच्या हातात काहीच नसतं. जे काही घडत आहे त्याला सामोरं जावं लागतं. हे काही सोप्प नव्हे”. अमृताने थोडक्यात अनुभव सांगितला आहे. आणि आता ती घरीच आराम करत आहे.





