आजची स्त्री घर सांभाळत आर्थिक जबाबदारी पार पाडण्यासाठी घराबाहेरही नोकरी करण्यास जाते. पण हे सगळं करत असताना स्त्रीला कुटुंबाचा पाठिंबा मिळणंही तितकंच गरजेचं असतं. कौटुंबिक पाठिंबा असेल तरच गगनभरारी घेणं तिला अधिक सहज शक्य होतं. असंच काहीसं सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांच्याबाबतही घडलं आहे. कलाक्षेत्रात काम करत असताना अलका यांना त्यांच्या कुटुंबियांचा, सासू-सासऱ्यांचा भक्कम पाठिंबा मिळाला. दोन्ही मुली तीन वर्षांच्या होईपर्यंत अलका त्यांना सेटवर घेऊन जायच्या. मात्र दोन्ही मुलींचं पुढचं सगळं संगोपन त्यांच्या सासू-सासऱ्यांनी केलं. याबाबत अलका यांनी अगदी खुलेपणाने भाष्य केलं आहे. (Alka kubal talk about her family)
ITSMAJJA च्या ठाकुर विचारणार या कार्यक्रमात अलका यांना त्यांच्या कुटुंबाबत, मुलींबाबत विचारण्यात आलं. तेव्हा त्या म्हणाल्या, “माहेरची साडी चित्रपट झाल्यानंतर मी खूप टॉपला होते. वर्षाला १५-१५ चित्रपट करत होते. ११ महिने तर मी शूटसाठी बाहेरच असायचे. कोल्हापूर, सातारा सतत मी तिथेच असायचे. मी प्रेग्नंसीच्या सातव्या महिन्यापर्यंतही काम केलं आहे. मला सगळेच सांभाळायचे. माझी तब्येतही वाढली होती. मग मी पदर सोडून पोट लपवायचे”.
आणखी वाचा – गिरीजा ओकच्या पायाला मोठी दुखापत, रुग्णालयामध्ये उपचार सुरु, उभं राहण्यासाठीही त्रास अन्…
“प्रेग्नंसी झाल्यानंतरही माझ्यासाठी बरेच निर्माते थांबले होते. कारण माझ्या दोन्ही मुलींच्यावेळी त्या तीन महिन्यांच्या झाल्यानंतर काम करायला घेतलं. मला गिरीश ओक नेहमी झाशीची राणी म्हणतो. हिचं बाळ सेटवर असतं कळतंही नाही असं तो म्हणायचा. सेटवर मुलींना घेऊन आल्यावर तेवढ्या वेळात त्यांना दूध पाजायचं, भरवून यायचं हे सगळं करायचे. कारण आई म्हणून मी कुठे कमी पडू नये असं मला वाटायचं. मुली बरोबर आहेत म्हणून मला शॉट द्यायला वेळ होत आहे हे मी कधीच केलं नाही. ९ वाजताच्या शूटला मी मेकअप, ड्रेस सगळं तयार होऊन मी बसायचे. सकाळी पाच वाजता उठून मुलीला उठवायचे, तिला मसाज करायचे, भरवायचे आणि मग तिला सेटवर न्यायचे. दोघीही तीन वर्षांच्या होईपर्यंत मी त्यांना शूटवर न्यायचे. माझ्या दोन्ही मुलींमध्ये पाच वर्षांचं अंतर आहे. तीन वर्षांच्या नंतर त्यांना नर्सरी, शाळा हे सगळं सुरु झालं. पण त्यावेळी मला माझ्या सासू-सासऱ्यांनी खूप पाठिंबा दिला”.
आणखी वाचा – “माझ्याकडे येऊन खूप रडला पण…”, तुषार घाडीगांवकरच्या जवळच्या मित्राने सांगितलं मृत्यूमागील खरं कारण, म्हणाला…
“समीरनेही (पती) मला तितकीच साथ दिली. कारण तोही तेव्हा तितकाच व्यग्र कॅमेरामॅन होता. माझे ३०० पेक्षा अधिक चित्रपट झाले असतील तर समीरचे २५० तरी चित्रपट झाले आहेत. त्यामुळे आम्ही दोघेही तितकेच व्यग्र होतो. समीरही कधी घरी असला तर पालकांचं कर्तव्य अगदी जबाबदारीने पार पाडत होता. माझ्या सासू-सासऱ्यांमुळे कधीही मुलांना पाळणाघरात ठेवण्याची वेळ माझ्यावर आली नाही. बरंच श्रेय मी त्यांनाच देईन. कारण मुलींवर सासू-सासऱ्यांचे संस्कार खूप झाले. मागे वळून बघताना मला असं वाटतं की, मुली ज्या काही घडल्या आहेत त्या सगळ्यामध्ये या संपूर्ण कुटुंबाचा मोठा वाटा आहे”. अलका यांनी त्यांच्या यशाचं, मुलींच्या यशाचं संपूर्ण श्रेय त्यांच्या कुटुंबाला, सासू-सासऱ्यांना दिलं आहे.





