Tushar Ghadigaonkar Suicide : दोन दिवसांपासून मराठी कलाविश्वात अभिनेता तुषार घाडीगांवकरच्या आत्महत्येच्या बातमीने भंडावून सोडलं. प्रत्येकजण तुषारच्या आत्महत्येची विविध कारणं देताना दिसला. मात्र, या आत्महत्येमागचं खरं कारणं काय?, असा प्रश्न सतत भेडसावत होता. तुषारच्या मृत्यूची बातमी इतकी वाऱ्यासारखी पसरली की, सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यासाठी खास पोस्ट लिहीत त्याची कायम आठवण येईल असं म्हटलं आणि त्याला श्रद्धांजली वाहिली. सगळ्यांच्या पोस्टमध्ये एक साम्य दिसलं, म्हणजे त्याचा मदत करण्याचा स्वभाव. कोणाला काय हवं ते सगळे जेवले का इथवर पाहून मग स्वतःच पहाणाऱ्या या तुषारने हा निर्णय का घेतला असेल बरं?. कामाच्या अभावामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललं नाही हे मात्र खरं आहे. हो. कारण तुषारचा जवळचा मित्र पंकज पंचारिया याने फेसबुक पोस्टद्वारे तुषारच्या या गंभीर निणर्यामागचं कारण सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
तुषार घाडीगांवकरचा मित्र पंकज पंचारियाची फेसबुक पोस्ट
“आत्महत्या हा इतका साधा विषय नाही. जो आपण आपल्या सोयीनुसार आपल्या लाइक्ससाठी किंवा तुषार कसा आमचा चांगला मित्र होता, आमचे आणि त्याचे कसे चांगले संबंध होते किंवा तुषारबद्दल असलेली चुकीची माहिती जी आपल्या सामाजिक माध्यमातून व्यक्त करुन आपले व्ह्यूस वाढवण्याची वापरावा. आपण इतके निर्दयी झालो का?. एकदा पण भीती नाही वाटली की आपली पोस्ट तसेच आपण काय बोलत आहोत याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर ( जे आता राहिलेच नाही) कौटुंबिक परिस्थितीवर काय परिणाम होईल. मेलेल्या माणसाच्या डोक्यावरचे लोणी खाणे म्हणजे काय असते. हे आज दिवसभरात पाहण्यास मिळाले. काही कलाकार पत्रकार मंडळी यांच्याशी बोलून अनेक पोस्ट आज डिलिटपण झाल्या. मुद्दा खूप साधा आहे. इतकी ताकद कुठून आली,की आपण पूर्वमाहिती न घेता सरळ सरळ पोस्ट करुन मोकळे होता. का एखाद्याची बदनामी करायची. दुःख पोस्ट टाकून, स्टोरी टाकून, किंवा जड शब्दांमध्ये कविता लिहून व्यक्त होत नाही. आपण ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक ऑस्कर जिंकणारे कलाकार नाही होणार.( काही वृत्तसंस्था किंवा पत्रकार जबाबदारीने बातमी देत आहे याचीपण जाणीव आहे) घटना खूप वाईट आहे मित्रांनो. एक मुलगा आज आयुष्य संपवतो. बाप त्याला खांदा देतो. भरल्या डोळ्यांनी अग्नी देतो. काय अवस्था असेल. बापाला ज्या वयात पाणी मुलगा देतो. त्या वयात बापाला आणि बापापेक्षा मोठ्या माणसाला आज शेवटचे पाणी देताना पाहिले. मन अजून खूप अस्वस्थ आहे”.
एका वर्षापूर्वी मी सोहम देवधरसह असताना तुषार आमच्याकडे येऊन आयुष्यातील अनेक गुंते सांगण्याचा प्रयत्न करत होता. (पण मोकळे पणाने नाही बोलला)खूप रडला, रडतच आपण चुकत आहोत, म्हणजे मी रडतो तर तुम्हाला चुकीचे नाही ना वाटतं असे तो मध्येच विचारतं होता. परत शांत होत होता. पण काय अडचण आहे काय प्रॉब्लेम आहे. यावर किंचित पण मोकळेपणाने बोलला नाही. याची त्यावेळेस जास्त भीती वाटली की माणूस का रडत आहे?. आज त्याला अग्नीवर ठेवल्यावर सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळत होती. की त्याला आयुष्य जड वाटू लागले. काय गुंता होता तो जळताना आज भरल्या डोळ्यांनी बघत होतो. ज्यावेळी तुषार माझी घरी आला होता. त्याच काळात मला माझ्या काही वैयक्तिक अडचणी किंवा माझ्या आयुष्यातील न सुटणारा गुंता यामुळे मलाच आत्महत्या करायची होती. मी माझ्या बहिणीची मानसिकता रोज तयार करायचो की आपले आई वडील गेले, जर तुझा भाऊ अचानक गेला तर तू छान आयुष्य जग. आणि ताई चिडली की म्हणायचो, किती घाबरते गं. पण त्यावेळी माझ्या मनात खरच आयुष्य संपवण्याचा विचार होता.
मी माझ्या डॉक्टरांकडे ज्यावेळी हे सगळे बोलून दाखवले. डॉक्टरांनी काही मित्रांना सांगितले त्यात शार्दुल सोहम हे दोन मित्र होते . सोहमने त्याकाळात खूप जास्त सांभाळून घेतले. मी मला काय वाटते हे तुषारला बोलून पण दाखवलं पण तो रडतच होता. तुषारला मी माझी अस्थिर मानसिक परिस्थिती सांगत होतो. त्यातून मी कसा बाहेर आलो, हे त्याला सांगण्याचा प्रयत्न केला. तुषारला मानसिक आरोग्याची अडचण आहे. हे मी बोलून दाखवल्यावर त्याला नाही आवडले. पुढील अनेक दिवस किंवा एक वर्ष माझ्याशी त्याने संपर्क नाही केला. मृत्यूच्या काही दिवसांआधी तो संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. पण ते माझ्यापर्यंत पोहोचले नाही. जे पोहचले ते आज सगळ्यांनी पाहिले. माझ्या हाताचे पिठलं भात त्याला खूप आवडले.आज त्याच माणसाला शेवटचे पाणी देऊन घरी आलो.आणि शांतपणे फक्त आणि फक्त डोळ्यांचे पाणी पुसत आहे.
आणखी वाचा – ‘अनुपमा’ मालिकेच्या सेटला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी, नेमकं काय झालं?
भारतातल्या अनेक अडचणींवर आपण चर्चा करतो. काळजी करतो. पण जवळील माणसे कधी कळतील का?, लोकांशी आपण अबोला ठेवतो. कोणत्या अहंकारात आपण जगतो?, समजून नाही घेत जवळच्या लोकांना. आत्महत्या करण्याचे विचार फक्त कलाकारांच्या मनात येत नाही. (त्यामुळे कोणत्याच कलाकाराला बदनाम करु नका) आयुष्य संपवणे हा अनेक नोकरदार वर्ग, क्लासवन ऑफिसर, व्यापारी, सामाजिक क्षेत्रात काम करणारे मान्यवर. घरात काम करणारी बाई, पोलीस, अशा अनेक लोकांना याचा त्रास होतो की, त्यांना त्यांच्या आयुष्यातील अडचणीमुळे असे विचार येतात आणि अनेक लोक पाऊलही उचलतात. पण ती वेळ खूप भयंकर असते. त्यामुळे आपण आपल्या जवळील लोकांशी बोलून आपल्या मित्रांची परिवाराची फक्त आणि फक्त काळजी घेऊ. मुक्त संवाद करु. परत कधीच आत्महत्याची पोस्ट माझ्यावर लिहिण्याची वेळ आता नको. मित्रांना शुभेच्छा देण्याच्या काळात श्रद्धांजली द्यावी लागते. किती त्रास असेल याचा… मित्रा असेल तिथे आता तरी खुश राहा.





