Udit Narayan Controversy : सुप्रसिद्ध गायक उदित नारायण पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या पहिल्या पत्नी रंजना नारायण झा यांनी केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. रंजनांनी पती उदित नारायण तसेच काही नातेवाईक आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीविरोधात गंभीर तक्रार दाखल केली असल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, रंजनांनी आरोप केला आहे की, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांबाबत त्यांना फसवण्यात आले. असं त्यांनी म्हटलं आहे.
१९८४ साली उदित नारायण आणि रंजना यांचा विवाह झाला होता. त्यानंतर उदित नारायण १९८५ मध्ये करिअरसाठी मुंबईत आले आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र काही वर्षांनंतर उदित यांनी दुसरे लग्न केल्याची माहिती रंजनाला माध्यमांद्वारे समजल्याचं सांगितलं जात आहे. रंजनांच्या दाव्यानुसार, १९९६ मध्ये उपचाराच्या कारणाने त्यांना एका रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांच्या नकळत त्यांचे गर्भाशय काढण्यात आले.
या घटनेदरम्यान उदित नारायण आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीची उपस्थिती होती, असा आरोपही त्यांनी केला आहे. यासोबतच मुंबईत गेल्यानंतर त्यांच्याशी गैरवर्तन झाल्याचं आणि त्यांना घरात प्रवेश नाकारण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर त्यांनी महिला आयोगाकडे धाव घेतली. संबंधित तक्रारीदरम्यान उदित नारायण यांनी रंजना या आपल्या पत्नी असल्याचं मान्य केल्याची माहितीही समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे उदित नारायण यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे, या आरोपांवर त्यांची अधिकृत प्रतिक्रिया काय असेल?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा – Ranveer Singh ला बिश्नोई गँगकडून धमकी, करोडो रुपयांची मागणी केली अन्…; घराबाहेर कडक सुरक्षा





