‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की, सायली साक्षीच्या खोलीत जाऊन गुपचूप तिच्या कपाटातून तिच्या विरुद्ध पुरावे शोधून काढते. यावेळी सायलीला कुणालबरोबरचे अनेक पुरावे सापडतात. ती तिथून निघताना विचार करते की, आपण तर गिफ्ट आणायला जातो असं सांगून निघालो आहोत .त्यामुळे बाहेरच्या दरवाजानेच आपल्याला पुन्हा आत गेलं पाहिजे. म्हणून सायली खिडकीतून बाहेर जाते. सायली अजून कशी आली नाही म्हणून अर्जुन अस्वस्थ होतो. पण तितक्यात सायली येते. सायलीला आलेलं पाहून अस्मिता विचारते तू गिफ्ट आणायला गेली होतीस तर गिफ्ट कुठे आहे?, ती सांगते, मी गिफ्टची सोय करुन आली आहे कारण चैतन्य व साक्षीला द्यायचं गिफ्ट हे अगदी लक्षात राहणारं हवं. त्यानंतर साखरपुड्याची अंगठी घालण्याची वेळ येते तेव्हा अर्जुनच्या मनात विचार येतो की, आपण चैतन्यला अंगठी घालण्याआधी सगळं खरं सांगितलं पाहिजे. त्यामुळे तो कल्पनाला इशारा करतो. त्यावर कल्पनाला सरबतची कल्पना सुचते. (Tharal Tar Mag Serial Update)
एकीकडे गुरुजी अंगठी घालायची वेळ झाली असं सांगतात. तेवढ्यात कल्पना त्यांना थांबवते आणि मी आई असल्याने मीच अंगठी चैतन्यला देणार असं म्हणते. हातात सरबताचा ग्लास घेऊन ती पुढे जाते आणि तिच्या पायाला ठेच लागून तिच्या हातातलं सगळं सरबत चैतन्यच्या कपड्यांवर सांडतं. यावर प्रताप चैतन्यला कपडे बदलून यायला सांगतात. माझ्या मित्राला तयार करणं माझ्याच नशिबात असल्याने मी त्याला पटकन तयार करुन आणतो, असं अर्जुन सांगतो. आणि त्याला वर घेऊन जातो. साक्षीच्या मनात यावर संशयाची पाल चुकचुकते. सायलीला आता का गिफ्ट आणायला जायचं होतं आणि आता का अर्जुन चैतन्यला घेऊन वरती जात आहे?, काही गडबड तर नाही ना?, असा ती विचार करते.
अर्जुन चैतन्यला छान तयार करतो आणि साक्षीबद्दल काहीतरी सांगायचं आहे आणि सायली काहीतरी पुरावे तुला दाखवणार आहे, असं सांगतो, पण चैतन्य काहीच ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसतो आणि तिथून निघतो, पण तेवढ्यात सायली त्याला थांबवते आणि सांगते की, माझ्याकडे ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्ही आज पाहिल्या नाहीत, तर आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला वाईट दिवस ठरेल. यानंतर सायली ते पुरव्यांच पाकीट चैतन्यच्या हातात देते. चैतन्यला अर्जुनही सांगतो की, त्या पाकिटात काय आहे ते एकदा बघून घे, मग नंतर तू जो काही निर्णय घेशील तो आम्हाला मान्य आहे. त्यानंतर चैतन्यला कुणाल व साक्षीचे फोटो त्या पुराव्यात दिसतात.
अगदी साक्षी व कुणाल यांचं लॉकेटसुद्धा सापडतं. तो धक्क्याने खाली बसतो. त्यावेळी अर्जुन त्याला सावरतो. कुणाल साक्षीचं हे कनेक्शन बघून आम्हालासुद्धा असाच धक्का बसला आणि खरा चेहरा कळला, असं अर्जुन सांगतो. आम्हाला हा फोटो आधीच मिळाला होता बाकी वस्तू आता मिळाल्या, असं सायली म्हणते. चैतन्य म्हणतो, मी जिच्यावर खरं प्रेम केलं तिला मी कसा विसरलो. अर्जुन सांगतो की तू प्रेम खरं केलंस म्हणून ओळखायला चुकलास. पण कुणालाच जीव घेतला आहे. यावर सायली सांगते, प्रेमाचं नाटक, साखरपुडा वगैरे सगळा तिचा स्वार्थ आहे. या सगळ्याशी आश्रमाच्या केसचा नक्कीच संबंध आहे म्हणून तर तिने तुमचा वापर केला चैतन्य सर. अर्जुन म्हणतो वापर केल्यावर तुलाही कुणालसारखी तिने लाथच मारली असती. तुझा वापर करताना ती एक गोष्ट विसरली की आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत.
आता साक्षी नावाच्या प्रॉब्लेममधून आपण एकत्र बाहेर पडायचं. चैतन्यला अर्जुनला सांगतो आम्ही आधीच एक मित्र गमावला आहे आणि तुला आता आम्हाला गमवायचा नाही म्हणून आम्ही इतके दिवस प्रयत्न करत आहोत. उद्याच्या भागात साक्षीला तिची पापे फेडावीच लागतील असं सायली सांगते. चैतन्य पोलिसातच देऊया असं सांगतो. अर्जुन म्हणतो वेळ आता शांत रहायची आहे, डोकं शांत ठेव. तुला आश्रम केसचे पुरावे मिळवण्यासाठी तिच्याबरोबर राहावंच लागेल आपल्यासाठी नाही तर आपल्या कुणालसाठी आणि तितक्यात तिथे साक्षी येते. आता चैतन्य साक्षीबरोबर साखरपुडा मोडणार का?, हे पाहणं येणाऱ्या भागात रंजक ठरेल.