बॉलिवूडमधील काही दर्जेदार अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे रणदीप हुड्डा. ‘सरबजीत’, ‘लव्ह आज कल’, ‘लाल रंग’, ‘हायवे’सारख्या काही दर्जेदार चित्रपटांतून त्याने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. चित्रपटात मोजक्याच भूमिका करत त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अशातच रणदीप सध्या वीर सावरकर या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे अभिनयासोबतच रणदीपने चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले. तसेच चित्रपट निर्मितीतही सहभाग घेतला.
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटातून अभिनेता रणदीप हुड्डा पहिल्यांदाच लेखन-दिग्दर्शन करत आहे. सर्वप्रथम हा चित्रपट महेश मांजरेकर दिग्दर्शित करणार होते. काही कारणास्तव महेश मांजरेकर यांनी यातून काढता पाय घेतला अन् दिग्दर्शनाची धुरा रणदीपने स्वतःच्या खांद्यावर पेलली. गेल्यावर्षी या चित्रपटाचा टीझर लोकांसमोर आला. तेव्हापासूनच या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. अशातच नुकताच चित्रपटाचा ट्रेलरही चाहत्यांच्या भेटीला आला. यावेळी अभिनेता रणदीप हुड्डा म्हणाला की तो कधीही कोणत्याही दिग्दर्शकाच्या हातातील कठपुतली झाला नाही असं म्हणाला होता.
अशातच पुण्यात नुकताच चित्रपटाचा मराठी ट्रेलर लॉंच सोहळा पर पडला. यावेळी रणदीपने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट तयार होताना किती अडचणी आल्या, याबद्दल त्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी तो असं म्हणाला की, “गेल्या एक-दोन वर्षात खूप काही झालं आहे. या चित्रपटाची निर्मिती होत असताना खूप उतार-चढाव आले. त्यामुळे जे काही झालं ते सगळं विसरून मी आता पुढे जाण्याचा विचार करत आहे. तसेच हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचेल? यासाठी मी अधिक उत्सुक आहे. सध्या माझं पूर्ण लक्ष याकडेच आहे. त्यामुळे जे झालं ते झालं.”
दरम्यान ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात अनेक कलाकारांचा सहभाग आहे. हा चित्रपट येत्या २२ मार्चपासून प्रदर्शित होणार असून हिंदीसह मराठी भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अनेक चाहते मंडळी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.