हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात बराच वाद सुरु आहे. अनेक राजकीय मंडळींचा याला विरोध आहे. तर राज्यातील बऱ्याच लोकांनी महाराष्ट्रात मराठीच भाषा हवी म्हणत चर्चेचा तोंड फोडलं. सतत सुरु असलेला विरोध पाहता राज्य सरकारने हिंदी भाषेची सक्ती, त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे आदेश रद्द केले. अशातच शुक्रवार (५ जुलै) राजकारणातील ऐतिहासिक दिवस ठरला. सरकारने रद्द केलेल्या आदेशाचा विजयदिवस शिवसेना (ठाकरे पक्ष) आणि मनसे यांनी मिळून साजरा केला. वरळीतील डोममध्ये ठाकरे बंधू एकत्र आले. यावेळी हजारोंची गर्दी जमली होती. (Tejaswini Pandit with Raj Thackeray Uddhav Thackeray)
उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोन्ही बंधू बऱ्याच वर्षांनी एकाच मंचावर एकत्र आले. हा क्षण कित्येकांसाठी स्वप्नवत होता. यावेळी राजकीय पक्षातील इतर मंडळींनी हजेरी लावली होती. ठाकरे बंधूंचं खरंतर शक्ती प्रदर्शन यावेळी पाहायला मिळालं. दरम्यान या मेळाव्याला काही मराठी कलाकारांनीही हजेरी लावली होती. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित मेळाव्यामध्ये दिसले. मात्र बऱ्याच मराठी कलाकारांनी मेळाव्याकडे पाठ फिरवल्याबाबत तेजस्विनीने भाष्य केलं.
आणखी वाचा – दीपिका कक्करला पुन्हा कॅन्सर होण्याची शक्यता, शोएब इब्राहिमने सांगितली अवस्था, म्हणाला, “ट्युमर खूपच घातक…”
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तेजस्विनी म्हणाली, “आज मुळातच सांगण्यात आलं आहे की, नो झेंडा ओन्ली अजेंडा. हेच सगळ्याचं उत्तर आहे. आम्ही इथे फक्त मराठीसाठी आलो आहोत. मराठीचा जो विजय झालेला आहे तो साजरा करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. यामधून कलावंतांना काय अपेक्षित आहे हे माहित नाही. मी माझ्यापुरता फक्त बोलू शकते. कलावंतांना काय पाहिजे? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जे दृश्य बघण्यासाठी महाराष्ट्र, आम्ही उत्सुक होतो, कित्येक वर्ष त्याची वाट पाहत होतो ते आज आम्हाला दिसणार आहे”.
आणखी वाचा – “जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं”, राज ठाकरेंच्या वक्तव्याची चर्चा, थेट सरकारला सवाल, म्हणाले…
“पुन्हा मी तेच सांगते की, बाकीच्या कलाकारांचं मला माहित नाही. मी माझ्यासाठी फक्त बोलू शकते. मला पण हा प्रश्न पडला आहे की मराठी कलाकार का येत नाहीत? इतर वेळा जेव्हा मदत लागते तेव्हा शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावला जातो. जेव्हा मराठीचा प्रश्न येतो तेव्हा लोक समोर येत नाहीत हे दुर्देवी आहे. मला पण अनेक प्रश्न आहेत. पण मी स्वतःविषयीच जे काही आहे ते बोलू शकते. आज मी इथे आली आहे हेच उत्तर आहे. मराठीचा विजय साजरा करण्यासाठी आणि दोन भावांना एकत्र बघण्यासाठी ते दृश्य अनुभवण्यासाठी मी इथे आहे”. तेजस्विनीने मेळाव्यात सहभागी होत राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला.





