‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्री नम्रता संभेराव व अभिनेता प्रसाद खांडेकरने आजवर प्रेक्षकांना अक्षरशः खळखळवून हसवलं आहे. या कार्यक्रमामुळे त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. याशिवाय नुकताच त्यांचा प्रदर्शित झालेला एकदा येऊन तर बघा या चित्रपटामुळेही ते चर्चेत आले. याशिवाय बऱ्याच दिवसांपासून नम्रता-प्रसाद आणखी एका विशेष कारणामुळे चर्चेत आले होते. ते म्हणजे ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकामुळे. (Prasad Khandekar and Namrata Sambherao On Play)
विशाखा सुभेदार यांच्या ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकाची सध्या जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. सध्या रंगभूमीवर हे नाटक विशेष गाजतानाही पाहायला मिळत आहे. अशातच या नाटकाबाबत समोर आलेल्या बातमीमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. विशाखा सुभेदार यांनी नाटकातील नव्या बदलाबाबत पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर अभिनेत्रीने त्यांच्या नाटकातून दोन चेहरे एक्झिट घेणार असून त्याजागी दोन नवे चेहरे येणार असल्याचं सांगितलं. अभिनेत्रीने प्रसाद व नम्रता यांच्या एक्झिटची बातमी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली.
नाटकातून एक्झिट घेतल्यानंतर प्रसादने आज याबाबत पहिल्यांदाच एक पोस्ट शेअर केली. यावेळी त्याने नाटकातून बाहेर पडण्याचा निर्णय एकत्र बसून घेतला असल्याचं स्पष्ट केलं. शिवाय त्याने नाटकाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या पोस्टमध्ये त्याने शेवटी “रंगभूमी आणि नाटकापासून फार काळ लांब राहू शकत नाही. सगळ्या टीमचा विचार करून आणि व्यवस्थित शेड्युल करून लवकरचं पुन्हा नवीन नाटक घेऊन येईन” असं त्याने म्हटलं आहे.
तर प्रसाद पाठोपाठ अभिनेत्री नम्रता संभेराव हिने नाटकातून बाहेर पडताच नाटकाच्या आगामी प्रयोगांसाठी स्पेशल पोस्ट लिहिली. तिनेही या पोस्टमध्ये नव्या कलाकारांचं स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान नम्रतानेही शेवटी रंगमंचापासून फार काळ लांब राहूचं शकत नाही. भेटू लवकरचं” असं म्हटलं आहे. प्रसाद व नम्रताच्या या पोस्टवरून दोघांचं नवं नाटक येणार असल्याची शक्यता दिसत आहे. दोघांनीही ‘कुर्रर्रर्रर्र’ नाटकातून एक्झिट घेत केलेल्या या पोस्टमध्ये रंगभूमीपासून फार काळ दूर राहू शकत नसल्याचं म्हटलं. यावरून ते नवीन नाटक आणणार असल्याचं चित्र दिसतंय.