बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार लवकरच ‘मिशन राणीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला. अभिनेत्याचे यावर्षी अनेक चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित झाले. मात्र ‘OMG २’ वगळता अन्य चित्रपट फ्लॉप ठरल्याने साहजिकच या चित्रपटाकडून सिनेप्रेमींना सर्वाधिक अपेक्षा आहे. काही दिवसांपूर्वी फर्स्ट लुक समोर आल्यानंतर नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. (Mission Raniganj Trailer)
सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात अक्षय माईन इंजिनियर जसवंत सिंग गिल यांची भूमिका साकारणार आहे, ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता ६५ कामगारांचे प्राण वाचवले होते. दोन मिनिट पंधरा सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये एका कोळशा खाणीत पाणी भरल्याने ६५ कामगार आत अडकल्याचे दाखवण्यात आले. कामगारांचे कुटुंबीय चिंतेत असून अक्षय व त्याची संपूर्ण टीम त्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी कश्या पद्धतीने प्रयत्न करतो, हे यामध्ये दाखवण्यात आले आहे.
हे देखील वाचा – Tharal Tar Mag New Promo: कोणी केला सायलीवर जीवघेणा हल्ला? अर्जुन वाचवू शकेल का सायलीला?
या चित्रपटात अक्षयसह परिणिती चोप्रा, रवी किशन, कुमुद मिश्रा, राजेश शर्मा, वरुण बडोला आदी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. विपुल के रावल यांनी चित्रपटाची कथा लिहिली असून टिनू यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. ६ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, अक्षयच्या या चित्रपटाचे नाव आधी ‘कॅप्सूल गिल’ असे होते. नंतर ते ‘मिशन राणीगंज : द ग्रेट इंडियन रेस्क्यू’ असे करण्यात आले आहे.
हे देखील वाचा – Video: ‘औक्षण, केक आणि मज्जा-मस्ती’, असा साजरा केला मित्रपरिवाराने वैभव तत्तववादीचा वाढदिवस, पोस्ट करत म्हणाला, “प्रत्येक क्षण जगण्यासाठी…”
चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून ट्रेलरमधील अक्षयच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. याआधीच्या अक्षयचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले असताना हा चित्रपट सिनेप्रेमींच्या पसंतीस उतरणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.