आषाढी वारीमध्ये वारकरी मंडळी मग्न झाले आहेत. माऊलींच्या नामस्मरणात वारकरी दंग असतानाच भक्तीमय वातावरण अगदी अनुभवण्यासारखं आहे. ही पायवारी राज्याच्या विविध भागांमधून जात असताना पालखीचं दर्शन घेण्यासाठी हजारो लोक गर्दी करतात. कित्येक वर्षांपासून आषाढी वारीची परंपरा सुरु आहे. वारकरी अगदी दंग होऊन पांडुरंगाची सेवा करतात. मात्र या सोशल मीडियाच्या काळात वारीमध्ये उगाच वाढणारी गर्दी, देखावा अधिक पाहायला मिळतो. रिल, शूटसाठी गर्दी करणारेही हजारो आहेत. याचबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी सोशल मीडियाद्वार पोस्ट करत सत्य परिस्थिती मांडली. (Shubhangi Gokhale on ashadhi wari)
वारीमध्ये वारकऱ्यांना खाण्याचे पाकिट, पाणी वाटताना बरीच मंडळी दिसतात. फोटो काढतात, रिल काढतात, मेकअप करुन वारीत महिलांना जेवण करण्यास मदत करतात. हे सगळं कशासाठी? असा सवाल शुभांगी यांनी केला. फेसबुक पोस्ट शेअर करत शुभांगी म्हणाल्या, “खूप वर्षांपासून मनात येत राहतं. वारी वर्षानुवर्ष शांतपणे, शिस्तबद्ध चाललेली असताना तिथे मोठाल्या गाड्या नेऊन खिचडीची पाकिटं घेऊन जा, केळी वाटायची, मेकअप करुन त्या अन्नपूर्णांच्यामध्ये जबरदस्तीनी घुसून भाकऱ्या भाजायच्या. असे अनेक प्रकार करुन त्या भक्तिपूर्ण वातावरणाचा विचका करायचा. कशासाठी?. काही दिवसांत “काजवा महोत्सव” नामक प्रकार सुरु होईल”.

“त्यांचा मिलनाचा काळ. मादी जमिनीलगत असते, नर आपल्या प्रकाशानी तिला आकर्षित करत असतात. अशा ठिकाणी बुटांनी जमीन तुडवत टॉर्चचा प्रकाश आणि बडबड करुन घोळक्यानी तिथे निसर्गाची लय बिघडून टाकायची. खूनच करायचा. खूप लिहायचंय पण उद्विग्नतेमुळे थकले. रामकृष्ण हरी, पांडुरंगा सांभाळ रे”.
शुभांगी यांची ही सुचक पोस्ट अगदी नेटकऱ्यांनाही पटली. त्यांनी या पोस्टवर विविध कमेंट करत आपलं मत व्यक्त केलं. बेशिस्त वृत्ती अधिक वाढत चालली आहे, शुभांगी ताई अगदी खरं आहे, सगळा बाजार, पब्लिसिटीचा खेळ आहे. याशिवाय कोणाला जगताच येत नाही, मी तुमच्या मताशी अगदी सहमत आहे, सगळ्याचा अतिरेक सुरु झाला आहे, नऊवारी साडी नेसून रिल करायची की, झाली वारी अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.





