‘सारे तुझ्याचसाठी’, ‘माझा होशील ना’ या या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे. आजवर गौतमीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. शिवाय गौतमी चर्चेत असते ती म्हणजे तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे. कायमच गौतमी तिची बहीण अभिनेत्री मृण्मयी देशपांडे बरोबरचे अनेक मज्जा मस्ती करतानाचे फोटो व्हिडीओ पोस्ट करत असते. आता मात्र गौतमीने शेअर केलेल्या एका भावुक पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गौतमीने तिच्या आजोबांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. गौतमीचे आजोबा आता या जगात नाहीत त्यांच्या आठवणीत गौतमीने एक भावुक पत्र लिहिलं असून आजोबांचे फोटो शेअर केले आहेत. (Gautami Deshpande On Grandfather)
गौतमीने आजोबांसाठी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय, “प्रिय आजोबा, पत्रास कारण की, आज तुमच्या आयुष्याच्या तिसऱ्या अंकाचा पडदा पडला ! आज माझ्या आजोबांची, आईच्या मामाचा बाबांची, आज्जीच्या प्रेमळ नवऱ्याची, उत्तम भावाची, आदर्श मुलाची अशा सगळया भूमिका असलेलं तुमच तीन अंकी नाटक इथेच संपलं. पण आजोबा काय सांगू तुम्हाला इतक्या कमाल वठवल्यात तुम्ही सगळ्या भूमिका! प्रत्येक भूमिकेच वेगळेपण तुम्ही जपलं. कथानक पण काय सुंदर आणि नाट्यमय होतं हो नाटकाचं, सुरूवात झाली ती स्वतःचे वडील जाण्यापासून, नंतर आईचा पुनर्विवाह, नवीन कुटुंबामध्ये प्रवेश, नवीन भावांचं सख्यांपेक्षा जास्त प्रेम.”
आणखी वाचा – “काही शोमध्ये कलाकारांची खेचली जाते आणि…”, अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “डोक्यात जातात कारण…”
“तुमच्यासारख्या हँडसम नायकाला साजेल अशा सुंदर नायिकेचा आयुष्यात प्रवेश, नायकाचं नाटकाविषयीच प्रेम, लग्न, दोन गोड़ मुलांचा जन्म. सारंच कथानक एखाद्या फिल्मला लाजवेल असं. तुमचे एक एक प्रवेश पण काय लाजवाब आजोबा. “एखाद्याचं नशीब” म्हणत एक सुंदर नायिका आयुष्यात आली. नकळत पणे मनाचे धागे जुळत गेले. मग ‘याला जीवन ऐसे नाव’ म्हणत तुम्ही पुढे गेलात ‘अशी पाखरे येती’ म्हणत संसार सुरु झाला. ‘नाटककराच्या शोधात तुम्ही सहा पात्र’ फिरत गेलात पुढे ‘शेहेनशाह’ बनून तुम्ही ‘नटसम्राट’ असल्याचा दाखवून दिलंत. दुःखांकडे पाठ फिरवत हसतमुखानं ‘तो मी नव्हेच’ म्हणत राहीलात असे आयुष्याचे खरे खुरे ‘किमयागार’ ठरलात.”
“‘चाणक्य’ बुद्धीने सतत आरोग्यक्षेत्राला योगदान देत आलात. तीन अंक कुठे कसे संपले कळलंच नाही. प्रेक्षक प्रत्येक नाटकातून काही ना काही घेऊन जातो. यातून काय बरोबर घेऊन जाऊ अन काय नको अस वाटतंय. त्यामुळे हे नाटकच आता सोबत ठेवणार आहेत आयुष्यभर. तुम्ही आता मात्र शांत व्हा. दमला असाल तुम्ही. आता खऱ्या अर्थाने पडदा पडला आहे. नाटक संपल्यानंतर तो तुमच्यातला नट आता शांत व समाधानी आहे. तुमच्यातला हा नट आम्ही आमच्यात आयुष्यभर जागा ठेवू आणि तुमच्या १०% तरी चांगुलपणा व सकारात्मकता आमच्यात यावी अशी प्रार्थना करू.”
आणखी वाचा – ‘बॉईज ४’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, निखिल-गौरवची दिसली झलक, ओंकार भोजने न दिसल्याने नेटकरी नाराज
“तुमच्याच एका प्रवेशातील हे वाक्य ‘झालेत बहू, असतील बहू, होतील बहू, पण या सम हा !!’ रंगदेवतेला वंदन करून हा तीन अंकी प्रवेशाचा पडदा पडला असं जाहीर करते आणि त्या नटसम्राटास पुन्हा एकदा वंदन करते. तुमची नात आणि तुमची फॅन गौतमी.” गौतमीचे आजोबा हे ही कलाकार होते. गौतमीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने आजोबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत ‘खूप छान लिहिलं आहेस’, असं म्हणत तीच कौतुक केलं आहे.