मालिकाविश्वात सक्रिय असणारा अभिनेता विकास पाटील मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत आहे. ‘बिग बॉस’ मराठी मुळे विकासच्या लोकप्रियतेत वाढ झाली. आजवर त्याने अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. काही महिन्यांपूर्वीच तो लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ मध्ये झळकला. या मालिकेत त्याने स्वामी समर्थांच्या मानसपुत्राची भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने त्याला आलेल्या स्वामींचा अनुभव शेअर केला. (Vikas Patil On Swami Samarth)
सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात विकास पाटीलने हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याला स्वामी समर्थांचा आलेला अनुभव शेअर केला. अनुभव शेअर करत तो म्हणाला, “अविनाश देशमुख यांच्या नाटकात मी काम करत होतो तेव्हा नाटक संपल्यावर एकदा अक्कलकोटहून काही लोक सरांना भेटायला आले होते. त्यांनी अविनाश देशमुख यांना स्वामी समर्थांची एक फ्रेम भेट दिली होती. ती मंडळी गेल्यावर मी तिथे गेलो तेव्हा अविनाश सर मला म्हणाले की, ही फ्रेम तू घरी घेऊन जा. तेव्हा मला स्वामी समर्थ कोण हे माहीत होते, पण माझा त्यांच्याशी फारसा संबंध आला नव्हता. अविनाश सरांच्या सांगण्यावरून मी ती फ्रेम घरी आणली आणि माझ्या बेडरूममध्ये लावली. येता-जाता मी त्याला नमस्कार करायचो.”
पुढे तो म्हणाला, “‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत मी स्वामी समर्थांच्या मानसपुत्राची भूमिका साकारली. त्यात माझा आणि स्वामींचा एक सीन आहे, ज्यात स्वामी मला म्हणजेच स्वामीसुतांना असं सांगतात की, तू माझा खरोखर भक्त असशील तर तू मला भेटण्याच्या खूप आधीपासून मी तुझी काळजी घेत असतो. तेव्हा मी या सगळ्या गोष्टी खूप रिलेट करू लागलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, काही वर्षांपूर्वी माझ्या घरी स्वामींची फ्रेम येणं, त्यांचे काही अनुभव येणं, जेव्हा जेव्हा मी एखाद्या संभ्रमात असायचो, तेव्हा एक शक्ती मला जाणवायची जी मला पाठिंबा द्यायची. तेव्हा मला कळलं की ते स्वामीच होते. माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर मला ही भूमिका साकारताना मिळाली.”
शेवटी त्याने आणखी एक अनुभव शेअर केला. तो म्हणाला, “जेव्हा मला या भूमिकेसाठी विचारणा झाली, त्याच्या आदल्याच आठवड्यात मी अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर आणि पंढरपूर या ठिकाणी जाऊन आलो होतो. त्यावेळी मला मिळालेलं दर्शन हे चमत्कारिक होतं. सोवळं नेसून आरती करायला मिळणं, रामनवमीच्या दिवशी रामाची मूर्ती पाळण्यात घालणं, हे सगळं अनवधानाने माझ्याकडून होत गेलं. यापैकी आपण काहीच ठरवलं नव्हतं. मग माझ्या लक्षात आलं की, हे सगळं स्वामींनी आधीच ठरवून ठेवलं होतं.”