लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून प्रसाद खांडेकरने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून त्याने प्रेक्षकांच्या मनात आपली छाप उमटवली. इतकंच नव्हे तर दिग्दर्शक म्हणून एकदा येऊन तर बघा हा त्याचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेसृष्टीत कुणीही वारसा नसताना स्वबळावर प्रसादने स्वतःच विश्व स्वतः तयार केलं आहे. ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रसादने खंत व्यक्त केली आहे. (Prasad Khandekar Struggle)
प्रसिद्धी, पैसा हे सर्वकाही असताना अशी कोणती गोष्ट आहे जी मिस झाली, असा प्रश्न प्रसाद खांडेकरला विचारला असता, त्याने उत्तर देत म्हटलं, “घरच्यांना वेळ देता येत नाही आहे. २०१६-१७ नंतर मी स्वतःच नवं घर घेतलं. आणि श्लोकचा जन्मही २०१६चा आहे. त्यानंतर २०१९ पासून ‘हास्यजत्रा’ सुरु झालं शिवाय नाटक वगैरे सुरूच होतं. माझ्या माझ्या जीवावर सर्व सुरु होतं मला कुठूनही पाठिंबा नव्हता. माझं एक वाक्य आहे जे मी प्रत्येक मुलाखतीत सांगतो, जर मला संधी मिळत नसेल तर मी माझ्या माझ्या संधी निर्माण करू लागतो”.
पुढे तो म्हणाला, “दिग्दर्शक म्हणून सुरुवातीला मला व्यावसायिक नाटक कोणी द्यायला तयार नव्हतं, तेव्हा आमच्या एकांकिकेचा पैसा एवढा जमा झाला होता तेव्हा आम्ही स्वतः नाटकाचे प्रयोग सुरु केले. असा मी माझा माझा प्रवास सुरु केला. एकदा मी घरी आलो तेव्हा असं झालं की, माझा पाच वर्षांचा मुलगा फाडफाड इंग्लिश बोलत होता, आणि तेव्हा माझं असं झालं की, मी माझ्या मुलाला मोठं होताना पाहिलंच नाही. मोठा होऊन तो इंग्लिशमध्ये कविता बोलताना दिसतोय. तर ही खंत मला नेहमी वाटते”.
यापुढे बोलताना प्रसाद म्हणाला, “आणि एक अजून खंत सांगायची म्हणजे, मी १४ वर्षांचा असताना माझे बाबा गेले. माझ्या वाचनाच्या आवडीपासून बऱ्याच चांगल्या सवयी त्यांनी मला लावल्या होत्या. मी तेव्हा चंपक, ठकठक ही गोष्टीची पुस्तक वाचायचो. त्यानंतर त्यांनी मला ग्रंथालयात वाचनासाठी पाठवलं तेव्हा तिकडे ही मी हीच गोष्टींची पुस्तकं वाचू लागलो, पण एकेदिवशी बाबा मला ओरडले आणि त्यांनी मला रामचंद्र सडेकरांचं ‘सोनेरी टोळी’ हे पुस्तक वाचायला सांगितलं”.
त्यानंतर प्रसाद म्हणाला, “एके दिवशी ‘सोनेरी टोळी’ हे पुस्तक मला मिळालं. ते पुस्तक मिळालं तेव्हा मला ते पुस्तक सुरुवातीला माझ्या बाबांना दाखवायचं होतं. मी सायकल घेऊन घरी आलो तेव्हा कळलं बाबा डेरीमध्ये गेलेत. आमची दुधाची डेरी होती. डेरीमध्ये गेलो तेव्हा कळलं बाबा शाखेत गेले आहेत. माझे बाबा शिवसेना पक्षात शाखाप्रमुख होते. शाखेत गेलो तर कळलं की दुसऱ्या दिवशी शाखेचा भगवा सप्ताह आहे तर ते तिकडे निघून गेले. आणि रात्री अचानक बातमी आली की बाबा गेले आहेत. त्यामुळे त्यांना ते पुस्तक शेवटपर्यंत दाखवायचं राहिलं” प्रसादने यावेळी त्याच्या प्रत्येक भावना व्यक्त केल्या.