टीव्हीवरील लोकप्रिय शोपैकी एक शो म्हणजे ‘इंडियन आयडल’. सध्या या शोचे १४वे पर्व सुरु आहे. १९ वर्षांपूर्वी या शोचं पहिलं सीझन प्रदर्शित झालं. या पर्वाच्या अंतिम लढाईत गायक अभिजीत सावंत व अमित साना यांच्यात चुरशीची लढाई पाहायला मिळाली. अंतिमत: अभिजीत या शोचा विजेता झाला, तर अमित उपविजेता ठरला होता. मात्र आता १९ वर्षांनंतर अमितने या शोबाबत खळबळजनक दावा करत असे म्हटले की, “चॅनलने अभिजीतला विजयी करण्यासाठी शेवटच्या तारखेच्या दोन दिवस आधीच त्याच्या वोटिंग लाईन्स ब्लॉक केल्या होत्या”. आता यावर अभिजीतने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
अभिजीतला विजेता बनवण्यासाठी निर्मात्यांनी खेळी केली. त्याचबरोबर राजकीय दबावामुळे अभिजीत त्या शोचा विजेता झाल्याचा आरोप अमितने केला. त्यावर आता स्वत: अभिजीतने प्रतिक्रिया देत त्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आरोपांवर “अमित हा अत्यंत भोळा असून या शोमध्ये तो एक रनरअप होता” असं म्हणत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘न्यूज १८’ला दिलेल्या एका मुलाखतीत अभिजीत म्हणाला, “अमित हा खूप भोळा आहे. मी बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. स्पर्धेत पराभूत होण्याची अनेक कारणं असतात. तो या शोमध्ये रनरअप होता. हे त्याने विसरू नये. शोमध्ये फक्त आम्ही दोघंच खूप प्रतिभावान होतो असं काही नव्हतं. तर त्यात इतरही अनेक प्रतिभावान गायक होते. मला असं वाटतं, की काही लोकांनी त्याचे कान भरले असावेत आणि हे सर्व भावनाप्रधान असू शकतं”.
अमितने स्पर्धकांवर राजकीय प्रभुत्व असल्याचा आरोपही केला होता. त्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अभिजीतने असे म्हटले की, “हे त्याचं वैयक्तिक मत असू शकतं. संपूर्ण देशभरातून आम्हाला मतदान केलं जात होतं. त्यामुळे एकाला मतं मिळत आहेत आणि दुसऱ्याला नाही, असं कसं होऊ शकतं?. ‘इंडियन आयडल १’ या शोवर आंतरराष्ट्रीय टीमचंही लक्ष होतं. ते त्यावेळी नेहमीच सेटवर असल्याचे मला अजूनही आठवतंय. त्यामुळे राजकीय प्रभुत्वासारख्या गोष्टींबद्दल आता चर्चा करणं मला अयोग्य वाटतं. आता त्या गोष्टींचा काहीच अर्थ नाही”.
दरम्यान इतक्या वर्षांनी अमित-अभिजीतच्या वक्तव्यांनी सिनेविश्वात रिअॅलिटी शो, त्यातील स्पर्धक व एकूणच या शोच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या या विधानांवरुन सिनेविश्वात कुजबूजदेखील सुरू झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.