झी मराठी वरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. कुशल हा उत्तम अभिनेता तर आहेच, पण अभिनयाबरोबरच तो एक चांगला लेखकही आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. याचं कारण सोशल मीडियावरील त्याच्या पोस्ट. तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो कधी त्याच्या आयुष्यातील दैनंदिन अपडेट देत असतो, तर कधी त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहितीही देत असतो. अशातच त्याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्याची ही पोस्ट सध्या खूपच चर्चेत आहे. (Kushal Badrike On Instagram)
२०२३ हे वर्ष आता संपायला येत असून येत्या नवीन वर्षांची सर्वांनाच चाहुल लागली आहे. अनेकजण या नवीन वर्षाचे आगमन करत असताना सरत्या वर्षाला निरोप देत आहेत. हा निरोप देत असताना काहीजण त्यांच्या आयुष्यातील घटना, प्रसंगे किंवा अनुभव शेअर करत आहेत. अशातच कुशलने नुकतीच २०२३ या वर्षाला निरोप देतानाची व येत्या नवीन वर्षाच्या आगमनाच्या शुभेच्छा देत एक पोस्ट शेअर केली आहे आणि ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टमुळे कुशलही चांगलाच चर्चेत आला आहे.
कुशलने स्वत:चा एक फोटो शेअर करत या फोटोखाली एक पोस्ट लिहिली आहे. यात त्याने असे म्हटले आहे की, “ह्या सरत्या वर्षाने जाताना बऱ्याच गोष्टी सोबत नेल्या. काही माणसं मनात घर करुन कायमची निघून गेली, त्या रिकाम्या घरांच्या जागा आता कधीच भरुन काढता येणार नाहीत. दरवर्षी प्रमाणे हे वर्षसुद्धा ‘व्याजाचा हप्ता’ जावा तसा माझ्यातला थोडा निरागसपणा घेऊन गेलाच. मी गुंतवणूक केलेल्या कायमस्वरूपी ठेवीप्रमाणेच माझ्यातही सामंज्यसपणा आला नाही. बहुतेक कुठे गुंतवणूक करावी आणि कुठे गुंतून जावं हे मला खरच कळत नाही. मित्रांनी सांगितलं आहे, नवीन वर्षात जाताना कोणत्याच भावनांचं ओझं बरोबर घेऊन जाऊ नकोस. म्हणून माझ्यातल्या मलाच थोडा मागे ठेऊन निघालो आहे.”
आणखी वाचा – Bigg Boss 17 : “तुझे कुटुंब मला…”, मुन्नवर फारुकी आयेशा खानसह लग्न करण्यास तयार?, म्हणाला “आपण दोघांनी…”
यापुढे त्याने सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा देत असे म्हटले आहे की, “येत्या वर्षात व्याज थोडं कमी लागू दे, गुंतवणुकीला मॅच्युरीटी येऊ दे आणि मनातली रिकामी घरं भाडेतत्वावर का होईना, पण जाऊदेत. मनाच्या उंबरठ्यावर पावलांची ये जा रहायला हवी.” त्याच्या या पोस्टखाली अनेकांनी कमेंट्स करत कुशलच्या लिखाणाचे कौतुक केले आहे. वा दादा खूपच छान, तुम्ही म्हणालात ते मनाला अगदी भिडलं, एक नंबर, तुझे विचार खूपच छान आहेत.” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्याचबरोबर त्याच्या या पोस्टला लाईक्स व कमेंट्सद्वारे तुफान प्रतिसाद दिला आहे.