बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर रविवारी दोन अज्ञातांनी गोळीबार केला. या घटनेनंतर पोलीस व गुन्हे शाखा सतर्क झाले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु असलेला पाहायला मिळत आहे. अशातच आता पोलिसांच्या या तपासाला यश मिळाले आहे. गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. दोन्ही आरोपींना गुजरातच्या भुज जिल्ह्यातून अटक करण्यात आल्याचं समोर आलं आहे. (Salman Khan House Firing)
या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच मंगळवारी गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली आहे. आता आरोपींची चौकशी सुरु आहे. या दोघांनी योजना कशी तयार केली? ते कधीपासून सलमानच्या घरावर नजर ठेवत होते?, याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्की गुप्ता व सुनील पाल अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील रहिवासी आहेत. हे दोघेही फेब्रुवारी महिन्यात मुंबईत आले होते आणि तेव्हापासून ते गोळीबाराची योजना आखत होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी गेल्या २ वर्षांपासून बिश्नोई टोळीसाठी काम करत होते. सुनील दुचाकीवरून जात असताना सागर पाल याने सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला. प्रथम सागर बिश्नोई टोळीचा भाग बनला त्यानंतर विकी या टोळीत सामील झाला. या दोन वर्षांत बिष्णोई टोळीने या दोन आरोपींना दिलेले हे पहिले काम होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी व सुनील फेब्रुवारी महिन्यात मुंबईत आले होते. आरोपींनी मध्य मुंबईतील एका हॉटेलमध्ये खोली घेतली होती आणि तेव्हापासून ते सलमान खानच्या घराची म्हणजेच गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी करत होते. काही दिवसांनंतर दोन्ही आरोपी पनवेलच्या हरिग्राम गावातील राधाकृष्ण सोसायटीत एका फ्लॅटमध्ये राहू लागले. ते पनवेलहून मुंबईत यायचे आणि सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर नजर ठेवायचे.
आरोपींनी त्यांच्या फ्लॅटचा करारनामाही केला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोपींनी २५-३० हजार रुपये देऊन भाड्याने घर घेतले होते. २४ हजार रुपयांना दुचाकी खरेदी केली. दुचाकीच्या प्रकरणात आरोपींनी दुचाकीची पूर्ण रक्कमही भरली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. संधीचा फायदा घेत रविवारी आरोपींनी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला आणि गुजरातला पळून गेले. मात्र, तेथून दोन्ही आरोपी पकडले गेले आहेत.
या घटनेनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने या प्रकरणाची जबाबदारी घेतल्याची माहिती आहे. अनमोलने एक फेसबुक पोस्ट केली होती ज्यात त्याने लिहिले होते की, “हा फक्त एक ट्रेलर आहे”. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोईनेच सलमानला मारण्यासाठी आपले शूटर पाठवले होते. बिश्नोई यांच्या पोस्टसाठी व्हीपीएन (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) वापरण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्याने म्हटले आहे. पोस्टाचा आयपी पत्ता पोर्तुगालचा असल्याचे आढळून आले आहे. बिश्नोई समाजात काळ्या हरणांना पवित्र मानले जाते. काळवीट मारल्याप्रकरणी सलमान खानवर खटला सुरु आहे. याच कारणामुळे १९९८च्या काळवीट शिकार प्रकरणामुळे लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमान खानला अनेकदा धमक्या दिल्या आहेत.