mayuri wagh separation news : ‘अस्मिता’ फेम अभिनेत्री मयुरी वाघ नेहमीच या मालिकेतील तिच्या भूमिकेमुळे चर्चेत राहिली. या मालिकेतील अस्मिता या भूमिकेने तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेनंतरही आजही मयुरीला अस्मिता या नावानेच ओळखलं जातं. व्यावसायिक आयुष्यात टॉपवर असताना वैयक्तिक आयुष्यात आलेल्या एका मोठ्या धक्क्याने मयुरीचा हा ग्राफ अगदी मोठ्या स्पीडने खाली कोसळला. अस्मिता मालिकेदरम्यान तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि वर्षभराच्या आतच तिने घटस्फोटासारखा मोठा निर्णय घेतला. अभिनेत्रीने अस्मिता मालिकेतील तिचा सहकलाकार पियुष रानडेसह लग्न केलं मात्र वर्षभरातच त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या घटस्फोटाबाबत अभिनेत्री कधीच खुलेपणाने बोलली नाही.
अशातच आता मयुरी वाघने सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं आहे. यावेळी लग्नाबाबत विचारल्यावर मयुरी म्हणाली, “मला आता कोणत्याच गोष्टीचं रिग्रेट नाही आहे. पण, मी लग्नाचा निर्णय खूपच लवकर घेतला असं मला वाटतं. कारण, मी आताची पिढी पाहतेय, लोक फार विचार करुन लग्न करतात. हे मी केलं नाही… पण, आताच्या मुली फार सॉर्टेड आहेत. एक एक्स अमाऊंट पगार असलेला मुलगा पाहिजे. त्याचं घर असायला पाहिजे. त्याच्या कुटुंबात या गोष्टी पाहिजेत. दोघांनाही सगळं सॉर्टेड लागतं. हे अलीकडच्या काळात लग्न करताना पाहिलं जातं. पण, माझ्या बाबतीत असं झालं नाही. तो एक प्रवाह होता आणि त्यातच मी लग्नाचा निर्णय घेतला. माझ्या आई-वडिलांनी सुद्धा या निर्णयात माझी साथ दिली. त्यांना त्यावेळी कदाचित हे सगळं पटलं नसेल पण, तरीही त्यांनी पाठिंबा दिला. सहा महिन्यांतच जाणवलं होतं आपला लग्नाचा निर्णय चुकला पण, मला ते कळायला आणि स्वीकारायला खूप वेळ लागला”.
पुढे ती म्हणाली, “तेव्हा ‘ती फुलराणी’ या मालिकेचं शूटिंग सुरु होतं. माझ्या त्या सेटवरच्या सहकलाकारांनाही जाणवलं होतं की, माझ्या आयुष्यात काहीतरी सुरु आहे. जे मी कोणाबरोबरही शेअर करू शकत नव्हते हे त्यांना अचूक कळत होतं. माझ्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी घडतंय; ज्या सगळ्याचा मला त्रास होतं, मी डिस्टर्ब आहे किंवा सीन संपला की हिच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे हे त्यांना दिसत होतं. माझे सहकलाकार त्यावेळी सतत माझ्याबरोबर असायचे. अनेकदा पहाटे दोन-तीन ते चारवाजेपर्यंत ते सगळे माझ्यासाठी थांबायचे. माझा सीन संपेपर्यंत ते थांबायचे. कारण, तेव्हा मला झोपच लागायची नाही. काय घडतंय, काय होतंय याबाबत मला कोणीच विचारलं नाही”.
“माझ्या आई-बाबांना पुढच्या चार महिन्यांत समजलं होतं की, हे सगळं चुकलंय पण, ही गोष्ट मला समजायला जवळजवळ दीड वर्षे गेली. लहानपणापासून माझ्या डोक्यात एक फिल्म सुरु असायची ज्यात मी हिरोईन आहे इतकंच मला वाटतं. त्यामुळे माझं सगळं भारी होणार आहे आणि माझं बेस्टच होणार आहे हे माझ्या डोक्यात पक्क होतं. माझं मन मला सांगत होतं की हे होऊच शकत नाही. ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला आहे ती व्यक्ती हे करु शकत नाही हे स्वीकारायला मला खूप वेळ गेला. आता असं जाणवतं की आपण तेव्हाच निर्णय घ्यायला पाहिजे होता. वेगळं होणं वगैरे या गोष्टी फार आधी घडल्या असत्या. पण, मला सगळ्या गोष्टी स्वीकारायला खूप वेळ गेला”, असं मयुरीने सांगितलं.
“मला असं नेहमी वाटायचं की माझं सगळं बरोबर आहे. माझ्याबरोबर काही चुकीचं घडू शकत नाही. त्यामुळे हे स्वीकारायला खूप वेळ गेला. त्यावर विचार करायला खूप वेळ गेला आणि त्यातून बाहेर पडायला खूप वेळ गेला. सगळ्या गोष्टींची जाणीव झाल्यावर जवळपास सहा महिने आता आयुष्यात पुढे जावं, थांबावं की, आहे तसं सोडून द्यावं हे मला माझंच कळत नव्हतं. पण, तेव्हा मी शूटिंग करत होते म्हणून मी सावरले. सकाळी आठ चा कॉलटाइम असायचा त्यात मी चार-पाचला झोपले. रात्रभर जागी. रात्री अडीच वाजता मशिन लावायचे, संपूर्ण किचनमध्ये साबणाचं पाणी टाकून सगळं घासून काढलंय. त्या काळात मी या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि कारण, फक्त एकच होतं मला माझ्या डोक्यातून सगळं काही काढून टाकायचं होतं. मी तेव्हा एकटीच होते. त्यामुळे घरात मासे आणून ठेवले होते. जवळच्या मित्रांजवळ मी सगळं बोलू शकत नव्हते त्यामुळे मी या माशांबरोबर बोलायचे. कारण मला माझ्याबरोबर जे होतंय ते स्वीकारणं जड जात होतं”.
“मला माझ्या आई-बाबांसमोर रडायला आवडत नाही. त्यांना मी बऱ्याच वाईट गोष्टी सांगितलेल्या सुद्धा नाही आहेत. त्यांना जर हे सांगितलं तर त्यांना खूप वाईट वाटेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काहीही होवो सेटवर जाऊन रोमँटिक सीन हे करावेच लागतात. आणि त्याच वेळी मालिकेत रोमँटिक ट्रॅक सुरु होता. पण, माझ्या वैयक्तिक आयुष्यात सेपरेशनचा काळ सुरु होता. या सगळ्यामुळे मला आता सहज कोणावरही विश्वास ठेवता येत नाही. अनेक गोष्टी मी समोरुन विचारल्या आहेत की असं असं कानावर येत आहे. त्यावेळी… ‘तुला माहितीये ना आपली इंडस्ट्री कशीये’ असं स्पष्टीकरण यायचं. हे ऐकून मग आपण आपल्या माणसावर विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटलं होतं. जेव्हा मला या सगळ्याचा रिअॅलिटी चेक मिळाला. तेव्हा ठरवलं की आता याच्यापुढे नाही”.
“लहानपणापासून मी अरेला कारे करणारी आहे आणि माझ्या वडिलांनी मला तसंच शिकवलं आहे. नाही पटत आहे तर बोल. त्यामुळे स्वतः सरप्राईज आहे की त्यावेळी मी का बोलले नाही. आता बसून मी विचार करते की मी असं का केलं, मी का इतकं ऐकून घेतलं. आणि का सहन केल्या. आपल्याकडे मुलींना सहन करायला शिकवलं जातं. लग्नानंतर गोष्टी बदलतात असं सांगितलं जातं, जरी एखादी गोष्ट नाही पटली तरी आपलाच माणूस आहे म्हणून त्या गोष्टी सोडून दिल्या जातात. पण, हे शिकवत असताना सगळ्या मुलींना या सगळ्याला एक लिमिट असते असंही सांगितलं पाहिजे. आपला स्वतःचा स्वाभिमान जपता आला पाहिजे”, असं मत मयुरीने व्यक्त केलं आहे.





