mayuri wagh second marriage news : मराठी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मयुरी वाघ. मयुरी वाघने आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये काम करत रसिकांच्या मनात घर केलं. अस्मिता ही तिची गाजलेली मालिका. ‘अस्मिता’ या मालिकेमुळेच तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. याच मालिकेच्या सेटवर तिच्या वैयक्तिक आयुष्याला कलाटणी मिळाली. मालिकेच्या सेटवर मयुरी सहकलाकार पियुष रानडेच्या प्रेमात पडली आणि तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी लग्नाच्या वर्षभरातच वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. आणि यानंतर वैयक्तिक आयुष्यात मयुरी पुरती कोलमडली.
मयुरीला घटस्फोटाच्या या धक्क्यातून सावरायला बराच काळ गेला. या तिच्या आयुष्यातील मोठ्या धक्क्याबाबत ती कधीच बोलली नाही. मात्र नुकत्याच सौमित्र पोटेच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत भाष्य केलं. या काळात आलेलं चढ-उतार, मिळालेली सहकलाकारांची साथ, मित्रांची साथ आणि आई वडिलांचा पाठिंबा याने तिला कसा धीर मिळाला याबाबत मयुरीने भाष्य केलं. दुसऱ्या लग्नाचा किंवा जोडीदाराचा विचार केला का? किंवा आयुष्यात पुढे गेलं पाहिजे असं वाटलं का?” असा प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात आला होता.
यावर मयुरी म्हणाली, “आयुष्यात घडलेल्या सगळ्या गोष्टींमुळे पुन्हा एखाद्यावर विश्वास ठेवणं जड जात होतं. हे सगळं माझ्या बाबतीत घडतंय हे मला पचतच नव्हतं. एखादी व्यक्ती माझ्यावर हात उचलतेय हे कसं काय घडू शकतं. असं काही होऊच शकत नाही या भावनेत मी होते. प्रत्येक गोष्ट स्वीकारायला मला खूप वेळ गेला. मी कायदेशीर गोष्टी सुद्धा करु शकत होते पण काहीच केलं नाही. कारण, मी सतत दडपणाखाली होते”.
शेवटी मयुरी म्हणाली, “आता कोणत्या गोष्टीवरुन वाद होईल, समोरच्याची प्रतिक्रिया काय असेल याचा काहीच अंदाज नव्हता. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मी खूप संघर्ष केला. यामुळे पुढचे काही महिने मी स्वतःला सगळ्यापासून दूर ठेवलं होतं”.





