१००व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यादरम्यान त्यांची एक खास मुलाखत घेण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी मराठी कलाकरांना चांगलंच सुनावलं. तसेच एकमेकाला मान न देण्यावरुनही खडसावलं. यावेळी बोलताना टोपणनावाचा मुद्दा अधोरेखित करत त्यांनी, “पहिली आणि शेवटची गोष्ट ती म्हणजे तुम्ही एकमेकांना मान दिला नाहीत, तर लोक तुम्हाला मान का देतील? तुम्ही एकमेकांना लोकांसमोर, अद्या, फद्या, शेळ्या, मेंढ्या, अंड्या अशा काही नावांनी हाका मारता. आज मराठीमध्ये बरेच कलावंत आहेत. पण मराठी चित्रपटांना स्टार नाही.” असं ते म्हणाले. (Anand Ingale On Raj Thackeray Statement)
हा मुद्दा ताजा असताना, हा मुद्दा चांगलाच व्हायरल होत असताना आनंद इंगळे यांनी राज ठाकरेंच्या या मुद्दयाला पाठिंबा दर्शिवला आहे. अभिनेता आनंद इंगळे यांनी ‘रेडिओ सिटी मराठी’ या रेडिओ चॅनलला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्यांना “तुम्ही गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड चर्चेमध्ये आहात. त्यावर तुमचं मत काय?” असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देत आनंद म्हणाले, “मला कळलं ते, ही गोष्ट मी फक्त तिथून ऐकली नाही. कारण याच्याआधीही राज साहेबांशी बोलताना अनेक वेळेला हा विषय निघाला होता. ते असं जाहीरपणे म्हणतील याचा मला सुखःद धक्का होता. ते म्हणत आहेत तो मुद्दा मला १०० टक्के पटतो” असंही ते म्हणाले.
यापुढे ते म्हणाले, “कोणी तरी मला माझ्या टोपणनावाने हाक मारुन माझी किंमत कमी होते असं नाही आहे. पण सगळ्याच जणांसाठी सगळ्या गोष्टी नसतात. ही लाइन जास्त अधोरेखित करायला पाहिजे” असं ते म्हणाले. याचबरोबर एक मुद्दा मांडत ते म्हणाले, “त्याच्यावर मला पुरक मुद्दा मांडायचा आहे. हे जसं आपण कलाकारांनी पाळलं पाहिजे. तसंच वेगवेगळ्या चॅनेलवरच्या अनेक कार्यक्रमांमध्ये किंवा पुरस्कार सोहळ्यात कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर विनोद करणंही थांबलं पाहिजे. काही कार्यक्रमांमधून मी अत्यंत कुचका आणि अत्यंत सतत किचकिच करणारा माणूस आहे, असं विनोद म्हणून जेव्हा समोर आणलं जातं. तेव्हा मला असं वाटतं, नंतर त्याचा परिणाम वेगळा आहे” असं त्यांनी म्हटलं.
शेवटी ते नाराजी दर्शवत, “आपणच ही गोष्ट जपायला हवी. नॅशनल टेलीव्हिजनवरून जपायला हवी. वैयक्तिक आयुष्यात जपायला हवी. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. राज साहेबांचं म्हणणं मला १०० टक्के पटतं” असं ते म्हणाले.