अभिनय क्षेत्रात असे काही कलाकार आहेत जे त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्यातील बऱ्याच कलागुणांनी ओळखले जातात. संकर्षण एक उत्तम अभिनेता तर आहेच, पण एक संवेदनशील कवी, निवेदक, लेखक, दिग्दर्शकही आहे. संकर्षणच्या कविता ऐकणं ही तर रसिकांसाठी पर्वणीच असते, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. नाटक, मालिका, चित्रपट या तीनही क्षेत्रात काम करून तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. संकर्षण उत्तम कवी, अभिनेता आहेच शिवाय तो उत्तम निवेदकही आहे. विविध कार्यक्रमांचे निवेदन करताना तो दिसतो. (Sankarshan Karhade Post)
संकर्षण सध्या रंगभूमीकडे वळला असल्याचं पाहायला मिळत आहे. सिनेक्षेत्रात मुशाफिरी करत असलेला संकर्षण सोशल मीडियावर देखील सक्रीय असतो. संकर्षण त्याच्या कामा संदर्भातील तसेच वैचारिक, काही मजेशीर तर कधी सामाजिक घडामोडींवर आधारीत पोस्टही सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. शिवाय संकर्षण नेहमीच त्याच्या परदेश दौऱ्यादरम्यान आलेले अनुभवही सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो.
अशातच संकर्षणने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त संकर्षण सध्या रत्नागिरी दौरा करण्यात व्यस्त आहे. संकर्षणने सोशल मीडियावरुन दौऱ्याला जातानाचे काही खास फोटो शेअर करत “‘रत्नागिरी’ शहरांत आल्या आल्या दिवसाची सुरवात अशी झाली. लोकमान्य टिळक जन्मस्थान आज मी पहिल्यांदाच पाहिलं. किती छान वाटलं. मग शहरातली फेमस ‘मिसळ आंबोळी’ खाल्ली. वाह. मज्जा आली. आता आज रात्री १० वा. प्रयोग आहे, तो ही खणखणीत होणार” असं कॅप्शन देत ही पोस्ट शेअर केली आहे.
‘नियम व अटी लागू’ नाटकाच्या प्रयोगानिमित कोकण दौऱ्यासाठी जात असतानाचे फोटो संकर्षणने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याच्यासह त्याची सहकलाकार अभिनेत्री अमृता देशमुखही दिसत आहेत. ही कलाकार मंडळी रत्नागिरी मधील फेमस अशा आंबोली उसळीचा आस्वाद घेताना दिसत आहेत.