मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता आस्ताद काळेने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तसेच, तो ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात सहभागी झाला होता. ज्यात तो अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. त्याच्या खेळीचे प्रेक्षक व चाहत्यांनी भरपूर कौतुक केले होते. काही दिवसांपूर्वी आस्ताद ‘सुभेदार’ चित्रपटात आपल्याला दिसला होता. शिवाय, त्याचं ‘चर्चा तर होणारच’ हे नाटक रंगभूमीवर सध्या सुरु आहे. (Aastad Kale Viral facebook Post)
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांची लंडन येथील वाघनखे आणण्याचा निर्णय घेतला होता. यासाठीचा करार देखील झाला असून लवकरच ही वाघनखे भारतात आणण्यात येणार आहेत. हा निर्णय होताच अनेकांनी कौतुक केले. शिवाय, अनेक प्रतिक्रियाही येत आहे. अशात सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या आस्तादने एक पोस्ट शेअर करत यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसते.
आस्तादने फेसबूकवर ही पोस्ट शेअर केली. त्यात त्याने राज्य सरकारचे अभिनंदन केले. शिवाय यावर आपलं मत करत अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला आहे. तो या पोस्टमध्ये म्हणाले, “‘वाघनखं’ आपल्याकडे आली आहेत हे चांगलंच आहे. त्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि आभार. पण ती आपल्याला ‘देऊन टाकली’ नाही, याची याठिकाणी कृपया नोंद घ्यावी.”
हे देखील वाचा – ‘आदिपुरुष’ फेम मराठमोळ्या अभिनेत्याची तेलुगू चित्रपटात एन्ट्री, ‘या’ भूमिकेत दिसणार, कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
“जगातील सर्व संग्रहालय एकमेकांना स्वतःकडील वस्तू अशाप्रकारे काही काळापुरती देतच असतात. यासाठी प्रचंड मोठी रक्कम डिपॉझिट म्हणून घेतली जाते. त्यासाठी कागदोपत्री खूप काटेकोर आणि कायदेशीर व्यवहार केला जातो. पण मला एक प्रामाणिक शंका आहे त्याचं जाणकारांनी कृपया निरसन करावं. त्या नतद्रष्ट अफझलखानाचं पोट फाडायला हिच वाघनखं वापरली होती, याचा काही ठोस पुरावा सादर झाला आहे का? हे मी खरोखरच विचारतो. मात्र मी पुन्हा सांगतो, हा ऐतिहासिक ठेवा आता स्वगृही असल्याचा आनंद मला निश्चितच आहे.”, असं आस्ताद या पोस्टमध्ये म्हणाला आहे.
हे देखील वाचा – Video : हजारोंची गर्दी, लोक पाया पडले अन्…; आनंद दिघेंच्या रुपात प्रसाद ओक ठाण्यातील टेंभीनाका देवीच्या चरणी, व्हिडीओ व्हायरल
त्याची ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून अनेक नेटकरी यावर आपली प्रतिक्रिया देत आहे. एका नेटकऱ्याने “तसा काही पुरावा नाही, पण भावना मात्र भरपूर आहे.”, अशी कमेंट केली असता त्यावर अभिनेत्याने “महाराजांनी अफझलखानाला मारण्यासाठी वापरलेली ‘वाघनखे’ तीच असावी, अशी माझी इच्छा आहे.”, असा रिप्लाय दिला आहे. एकीकडे काही दिवसांपूर्वी मराठीसह बॉलिवूड कलाकार मंडळींनी राज्य सरकारचं अभिनंदन केले असताना आस्तादची ही पोस्ट सध्या चर्चेत येत आहे.





