Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule : ‘स्टार प्रवाह’वाहिनीने नुकतीच सहा मालिका आणि दोन कार्यक्रमांची घोषणा केली. या नव्या मालिका येताच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यांत आता एका मालिकेचा प्रवाह संपणार आहे. मालिकेचा टीआरपी कमी होताच वा अन्य काही कारण असताना त्या कमी कालावधीत संपवण्यात येतात. अशातच आता ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेचा शेवट होणार आहे. पण ही मालिका संपत असली, तरी येत्या काळात ही मालिका वेगळ्या रूपात पाहायला मिळू शकते, असं मालिकेच्या निर्मात्यांचं म्हणणं आहे. ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेतून प्रेक्षकांनी त्यांचा प्रवास पाहिला आहे. पण खऱ्या अर्थानं त्यांची गोष्ट जिथून सुरू होते; त्याच टप्प्यावर मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
याबाबत अमोल कोल्हे यांनी मुंटाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ते म्हणाले, “मालिका १४ जूनला बंद होतेय. संपवण्याचा निर्णय वाहिनीचा आहे. मालिकेला लागणारा खर्च आणि महसूल यांचं गणित जुळत नसल्याचं कारण मला सांगण्यात आलं. मालिकेत आता सुरु असलेल्या कालखंडापर्यंत गोष्ट करायची असंही अधिकृतरीत्या सांगण्यात आलंय; पण खरं तर तिथून गोष्ट सुरु होते. एकीकडे आपण महात्मा फुले यांचं द्विजन्मशताब्दी वर्ष साजरं करतोय. पण त्याच वेळी शिक्षण क्षेत्रात महान कार्य केलेल्या फुले दाम्पत्यावरील मालिका अवघ्या १५२ भागांमध्ये संपतेय, हे दुर्दैव आहे. पण त्यांची गोष्ट थांबणार नाही. फक्त ‘स्टार प्रवाह’वरची मालिका संपतेय, मात्र तो विषय संपलेला नाही. त्यामुळे लवकरच त्यांची गोष्ट वेगळ्या मंचावर पाहायला मिळेल. आताच्या मालिकेतला किमान ९० टक्के संच तोच असेल”, असं डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.
आणखी वाचा – “आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन
पुढे ते म्हणाले, “मालिकेसाठी वाहिनीचे सतीश राजवाडे, कौस्तुभ बेडेकर, अभिजीत खाडे या सगळ्यांनी फुले दाम्पत्यावर मालिका यावी यासाठी खूप सहकार्य केलं. किंबहुना त्यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला होता. पण त्यांच्याही वर असणाऱ्यांची विचारप्रणाली नेमकी काय आहे, हे आपल्याला सांगता येत नाही, असंही अमोल कोल्हे यांनी आवर्जून नमूद केलं अनेकदा मालिका संपवण्यामागे टीआरपीचं कारण पुढे केलं जातं. ज्या मालिकांना टीआरपीविषयी अमोल टीआरपीच्या मोजपट्टीत बसवलं जातं, त्याची ‘अर्कायवाल व्हॅल्यु’ माणजे त्याच्या भविष्यातील जतन मूल्याचा विचारच केला जात नाही”.
आणखी वाचा – तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी
शेवटी अमोल कोल्हे म्हणाले, “‘राजा शिवछत्रपती’ ही मालिका आज एका वेगळ्या वाहिनीवर दाखवली जातेय. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका अनेक भाषांमध्ये डब झाली. म्हणजे जतन मूल्याला सोयीनं लपवून ठेवलं जातं आणि फक्त टीआरपीचा बागुलबुवा पुढे केला जातो. वाहिनीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सकाळी दाखवल्या जाणाऱ्या मालिकेचा नवीन भाग बरेच प्रेक्षक पाहतात. पण संध्याकाळी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या भागाचाच टीआरपी मोजला जातो. अॅपवर मालिका बघणं हे टीआरपीमध्ये अद्याप मोजलं जात नाही. त्यामुळे टीआरपीचं कारण हे माझ्या मते अर्धसत्य आहे”.




