गेली सव्वा चार वर्षे ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. एका मागोमाग एक येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. बरेचदा मालिकेतील कथानकामुळे ही मालिका ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकलेली पाहायला मिळाली. अरुंधतीचा मालिकेतील खडतर प्रवास पाहणं प्रेक्षकांना विशेष भावतंय. अशातच सध्या मालिकेत आशुतोष केळकरच्या मृत्यूने अरुंधतीवर खूप मोठं संकट ओढवलं आहे. (Aai Kuthe Kay karte troll)
अरुंधती सध्या केळकरांच्या घरी राहत नसून ती देशमुखांच्या घरी राहायला आली आहे. आणि हे काही संजनाला हे काही पटलेलं नाही. त्यामुळे संजना काही ना काही कारण काढून अरुंधतीला सुनावताना दिसत आहे. अशातच मालिकेच्या एका समोर आलेल्या प्रोमोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेत आशुतोष आणि अरुंधतीची मुलगी मनु ही पुन्हा परतली असल्याचे पाहायला मिळत आहे. मनु अरुंधतीला सांगताना दिसत आहे की, ‘मी आहे तू काहीच काळजी करु नको’. तितक्यात तिथे संजना येते.
संजना मनूला सांगते की, ‘मनु तुला माहिती आहे का?, तुझ्या आईमुळे तुझ्या बाबांचा अपघात झाला’. हे ऐकून मनूला खूप राग येतो आणि म्हणून ‘हो आई आय हेट यू’, असं म्हणून तिथून निघून जाते. त्यानंतर अरुंधती संजनाला चांगलंच सुनावते. अरुंधती संजनाला म्हणते की, “माझ्या नात्यांच्या मध्ये यायचा प्रयत्न करू नकोस, आणि हे मी तुला शेवटचं सांगतेय”, असं तिला खडसावते. अरुंधतीने आता संजनाला सक्त ताकीद दिलेली असते. दरम्यान समोर आलेल्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट करत मालिकेला ट्रोल केलेलं पाहायला मिळत आहे.
नेटकऱ्यांना मनु पुन्हा मालिकेत आलेली आवडलेली नाही. तर काहींनी संजनाला बोलण्याची शिस्त नाही असं म्हणत तिलाही ट्रोल केलं आहे. तर अनेकांनी मालिका बंद करा असंही म्हटलं आहे. “खरंतर मनू परत यायलाच नको. अशा दत्तक मुलीमुळे तर सर्व अरुंधतीच्या आयुष्याची वाट लागली”, “खरंतर आशु या मनूमुळे गेला. आणि या संजनाच्या दोन थोबाडीत मारा”, “ही संजना, अनिरुद्ध आणि त्याची बिनडोक मुलगी ईशा कधीही सुधारणार नाहीत. स्वार्थी लोक आहेत”, “मनूमुळे आशुतोष गेला आता कशाला आली आहे”, असं म्हणत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.