सर्वसामान्य माणूस असो वा एखादा कलाकार त्याला तडजोड, सुख दुःख, सततच्या न भागणाऱ्या गरजा यांसारख्या अनेक गोष्टींना समोर जावं लागत. खडतर प्रवास करून आयुष्यात काहीतरी करण्याची उमेद घेऊन ही कलाकार मंडळी सिनेसृष्टीत धडपड करत असतात. हा प्रवास बऱ्याच कलाकारांचा अद्याप सुरु आहे. प्रयत्न करून थकल्यानंतर आलेली नकारात्मकता त्यांचं जीवन उध्वस्त करू शकते. मात्र ही काळात मंडळी या नकारात्मकतेला न घाबरता सामोरी जातात. असाच एक नाकारात्मकतेचा अनुभव एका मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला आहे. (Ashvini Mahangade Struggle Story)
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. अश्विनीला या मालिकेतील अनघा या भूमिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. अभिनयसोबतच अश्विनी सामाजिक कार्यात विशेष लक्ष देताना पाहायला मिळते.समाजाप्रती, गड, किल्ले यांविषयी तिची असणारी तळमळ नेहमीच पाहायला मिळते. इतकंच नव्हे तर ‘महाराष्ट्र शाहीर’ सारख्या मोठ्या चित्रपटातही अश्विनीने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आज लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली अश्विनीचा इथवरचा प्रवास काही सोप्पा नव्हता.
करिअरच्या सुरुवातीला प्रयत्नांना यश न आल्याने थेट अश्विनीने टोकाचं पाऊल उचललं होतं. तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता, याबाबत अश्विनीने ‘अजबगजब पॉडकास्ट’ला मुलखात दिली, त्यावेळी भाष्य केलं. अश्विनी म्हणाली, “आपण करिअर सुरु करतो ना तेव्हा प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण येतो की तेव्हा एकदातरी वाटतं की आपण संपलोय, आपण उध्वस्त झालोय. मला काहीच आणि अजून किती वर्ष प्रयत्न करायचे. आयुष्यात किती आणि काय म्हणून सगळ्यांना समोर जायचं, मग मला जगायचंच नाही असं मनात येऊ लागत. आणि मला जगायचं नाही आहे असं मला वाटलं होतं.”
अश्विनी पुढे म्हणाली, “मी आत्महत्या करायला ही गेले होते, की आता नाही जमणार आहे, आता इथे मला थांबावंच लागेल. मीरा रोडला एक शिवार गार्डन एरिया आहे, तिकडे एक तलाव आहे. मी तिथपर्यंत जाऊन बसले होते. माझ्या पाठोपाठ नाना आले, माझ्या शेजारी बसले. मी खूप रडत होते. ते शांतपणे शेजारी बसले. मला त्यांनी शांत होऊ दिलं, मग त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, हे सांगताना मला अजूनही रडू येतंय, नानांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांनी एकच गोष्ट सांगितली, बघ परमात्म्याने तुला काहीतरी बेस्ट करायला इथे पाठवलं आहे. आणि ते बेस्ट अजून पर्यंत तू केलेलं नाहीस. मग तुझी सुटका कशी होणार इथून? ते बेस्ट करण्यासाठी थांब. आणि मी थांबले.”