बॉलिवूडमधील विनोदी अभिनेता म्हणून जॉनी लिव्हरचे नाव घेतलं जातं. आजही जॉनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. विविध चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. नुकतच त्यांनी अभिनेता हृतिक रोशनबद्दल केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. हृतिकने 50व्या वर्षीही स्वतःला मेंटेन ठेवले आहे. त्याने 2000 साली चित्रपटसृष्टीमध्ये ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून अभिनेत्री अमीषा पटेलबरोबर पदार्पण केलं. हा चित्रपट प्रचंड चालला. या चित्रपटामध्ये फरीदा जलाल, अनुपम खेर, मोहनिश बहल यांच्याबरोबर जॉनी लिव्हर यांनीही प्रमुख भूमिका केली होती. पण या चित्रपटादरम्यान हृतिक रोशन आजारी पडला होता. तेव्हा त्याच्यावर कसे उपाचर केले?, हृतिक कसा बरा झाला? याबद्दल जॉनी यांनी वक्तव्य केले. (Johnny lever on Hrithik roshan)
हृतिकने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून पदर्पण केले होते. 10 कोटी रुपयांमध्ये बनलेल्या चित्रपटाने तब्बल 80 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर या चित्रपटाच्या इव्हेंटसाठी सर्व जण नाशिक येथे गेले होते. तेव्हा एक किस्सा घडला तो जॉनी यांनी ऐकवला.
त्यांनी सांगितले की, “हृतिकचा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी आम्ही सर्व एका इव्हेंटसाठी नाशिक येथे गेलो होतो. हृतिक चित्रपटामुळे खूप प्रसिद्ध झाला होता. पण जेव्हा आम्ही विमानातून उतरलो तेव्हा राकेश रोशन मला निराश वाटले. मी त्यांना विचारले काय झालं म्हणून ? तेव्हा त्यांनी सांगितले की हृतिकची समस्या आहे”.
त्यावर जॉनी यांनी विचारले की, “काय समस्या आहे? तेव्हा राकेश यांनी सांगितले की लहानपणापासूनच हृतिकच्या यकृताला सूज आहे. त्यामुळे त्याची तब्येत बनत नाही. असाच बारीक आहे. खूप साऱ्या गोळ्या खातो पण काहीही फायदा होत नाही. तेव्हा राकेशने मला लगेच आठवण करून दिली की ‘कोयला’ चित्रपटाच्या वेळी जीजसचं नाव घेऊन काहीतरी केलं होतस तसं काही करू शकतोस का?”, त्यावर मी म्हणालो की, “मी करेन. तो माझ्या मुलासारखाच आहे. मी त्याला बोलावलं आणि जीजसचं नाव घेऊन म्हंटलं जा. राकेशचा माझ्यावर विश्वास होता. जे काही करतो ते देव करतो. पण माझा फक्त हात लागतो. तो दिवस आणि आजचा दिवस यामध्ये हृतिकने कोणत्याही गोळ्या खाल्ल्या नाहीत”, असं जॉनी यांनी सांगितलं.
जॉनी यांचा हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यांना अनेक प्रक्रियांचा सामना करावा लागला. पण या सर्व प्रकारावर हृतिक व राकेश यांनी कोणतेही भाष्य केले नाही.