Archana Patkar’s Hardship: काही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करतात. कधी त्यातील पात्रे लाडकी होतात तर काही मालिकेतील कथानक मनाला भावतात. अशा मालिका जेव्हा निरोप घेतात, तेव्हा प्रेक्षक नाराज होतात. अशीच एक मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका. या मालिकेने जवळपास पाच वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं. मालिकेतील कलाकरांना देखील प्रचंप्रेम मिळालं. तसेच यातील इतर पात्रांप्रमाणे कांचन आजीची भूमिका ही प्रचंड गाजली. ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी ही भूमिका साकारली होती. आजवर अनेक भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
नुकतीच अर्चना पाटकर यांनी इट्स मज्जाच्या ठाकूर विचारणार या कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांच्या कठीण काळाबद्दल त्यांनी भाष्य केलं. त्यांच्या कठीण काळाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, ” ‘इना मीना डिका’ या चित्रपटानंतर माझ्यावर खूप कठीण परिस्थिती ओढावली होती. ‘इना मीना डिका’ या चित्रपटाला पुण्यात प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पण मुंबईमध्ये चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही, कारण त्यावेळी माझ्या सासऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि माझ्या दिराचं नवीन लग्न झालं होतं, त्यामुळे मुंबईत आम्हाला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लक्ष देता आलं नाही. म्हणून ‘इना मीना डिका’ चित्रपट लॉसमध्ये गेला. आमच्याकडे जे काही होतं ते सगळं आम्ही गमावलं होतं. काही देणगीदारांचे पैसे थकले होते. पण पैसे आणायचे कुठून हा देखील प्रश्न आमच्यासमोर होता. आमची जमीन विकून देणगीदारांचे पैसे देण्याचं आम्ही ठरवलं पण ते ही शक्य झालं नाही. कालांतराने मला मालिका, नाटक आणि चित्रपटांत कामं मिळत गेली आणि ती कामं करुन मी देणगीदारांचे पैसे परत केले.”
पुढे एक अनुभव शेअर करत त्या म्हणाल्या, “दिवाळीच्या सणात आमच्या घरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठी पूजा असते, त्यावेळी माझा चेक बाउन्स झाला. त्यामुळे आमच्याकडे पुरेसे पैसे नव्हते, जेमतेम आमच्याकडे फक्त दीडशे रुपये होते. त्या परिस्थतीत आमच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानंतर नेमका त्याचदिवशी प्रोड्युसरचा एक माणूस पैसे घेऊन आला. आणि त्यादिवशी आम्ही मोठ्या थाटामाटात लक्ष्मी देवीची पूजा केली. असं अनेकदा देवाने मला कठीण परिस्थितीत साथ दिली.” हा अनुभव अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी शेअर केला.




