Archana Patkar Talk about reality of industry : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘आई कुठे काय करते’ हिने तब्बल पाच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ही मालिका केवळ कौटुंबिक कथानकामुळेच नव्हे, तर सशक्त अभिनयामुळेही विशेष चर्चेत राहिली. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका सातत्याने अव्वल स्थानी असायची. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं असून आजही या मालिकेतील भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या मालिकेतील अशीच एक अत्यंत गाजलेली भूमिका म्हणजे ‘कांचन आजी’. कांचन आजीच्या पात्राने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. या भूमिकेतून अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष ठसा उमटवला होता.
दरम्यान, कांचन आजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’ वाहिनीवरील ‘ठाकूर विचारणार’ या कार्यक्रमाला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्या करिअरमधील कठीण काळ, वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष आणि कलाकारांच्या आयुष्यातील वास्तव यावर मनमोकळेपणाने भाष्य केलं.
आणखी वाचा – ‘पारू’चं स्वप्न अहिल्यादेवी पूर्ण करणार?, मालिकेत मोठा TWIST! पारू-आदित्यला अहिल्यादेवींची साथ
अर्चना पाटकर म्हणाल्या, “‘इना मीना डिका’ या चित्रपटानंतर माझा वाईट काळ सुरु झाला होता. हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित होण्याआधीच माझ्या सासऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी आम्हाला प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागला. आमच्याकडे जे काही होतं ते सगळंच संपलं, असं म्हणायला हरकत नाही.” त्या पुढे म्हणाल्या, “सकाळी उठल्यापासून देणगीदारांची फोन सुरु व्हायचे की आमचे पैसे कधी देणार?, ज्यामुळे पुढे मी कुठून पैसे आणायचे हा प्रश्न पडायचा. याशिवाय रोजच खाण्यापिण्याचं कसं करायचं?, हा प्रश्न देखील पडायचा. ज्यामुळे मी माझ्या मुलाला आणि सासऱ्यांना मालवणला पाठवलं आणि पुढे मला जे काम मिळत गेलं ते मी करत गेले.”
त्या काळातील इंडस्ट्रीचं वातावरण सांगताना अभिनेत्री अर्चना पाटकर म्हणाल्या, “तेव्हा सिरीयल्स एपिसोडिक असायच्या. ज्यामुळे चार-पाच दिवसांसाठी काम मिळायचं. तेव्हा माझी एक सिरीयल सुरु होती, तीन नाटकं सुरु होती आणि चित्रपटाचंही काम सुरु होतं. त्या सगळ्यातून मिळणाऱ्या पैशातून मी लोकांची देणी फेडायचे. आपली इंडस्ट्री अशी आहे की आपण घरी उपाशी आहोत की खिचडी खातोय, हे कुणालाच दिसत नाही. पण सेटवर तुम्ही कोणत्या गाडीतून उतरताय, हेच लोक जास्त पाहतात”, अशा शब्दांत अर्चना पाटकर यांनी आपल्या आयुष्यातील कठीण काळ उलगडून सांगत कलाकारांच्या आयुष्यातील वास्तवही स्पष्ट केलं आहे.




