‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेच्या कथानकाने आणि मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेय. मालिकेच्या आजच्या भागातही एक ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे. अस्मिताचं भांड फुटणार असून तिला सायली रंगेहात पकडताना दिसणार आहे. आजवर अस्मिताने सायली व अर्जुन यांच्या नात्यात अडचणी याव्या म्हणून तन्वीच्या मदतीने खूप कटकारस्थान केली आहेत. इतकंच नव्हे तर सायली व अर्जुन यांच्याबद्दलही एक गुडन्यूज समोर आलेली पाहायला मिळणार आहे. (Tharala Tar Mag Promo)
मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, सायलीला घराबाहेर काढण्यासाठी, त्यांचं सत्य पुर्णा आजीसमोर आणण्यासाठी अस्मिता सायलीच्या रुममध्ये मोबाइल लपवून ठेवते, पण तिचा हा प्लॅन फ्लॉप ठरतो आणि तिच्यावरच उलटतो. सायली अस्मितासमोरच तिने तिच्या खोलीत लपवलेला फोन काढून घेते. यावरून अस्मिता सायलीला जाब विचारते की, व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू ठेवून गुपचूप खोलीत फोन का लपवला, असं तिला तिथे काय घडताना बघायचं होतं. तेव्हा हाच प्रश्न सायली ही अस्मिताला विचारते, तिने त्यांच्या खोलीत का फोन लपवला होता? तिला असं काय बघायचं होतं? हे ऐकल्यावर अस्मिताची बोलती बंद होते.
अस्मिताच्या रागाचा पारा चढतो आणि ती म्हणते की ती सर्वांना बोलावून सायलीने काय केलं ते सांगणार आहे. तेव्हा सायलीच ही न घाबरता बोलावं असं सांगते. आणि तिच्यासमोर चुकांचा पाढा वाचून दाखवते. ते ऐकून अस्मिता पूर्णतः घाबरते. सायली व अस्मिताचं बोलणं अर्जुन ऐकतो. तेव्हा त्याला सायलीबद्दल अभिमान वाटू लागतो. अर्जुन सायलीचं तोंडभरून कौतुक करतो, आणि सावध राहण्याचा इशारा ही देतो.
तर मालिकेच्या येणाऱ्या भागात एक ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे, याची एक झलक मालिकेच्या शेवटी पाहायला मिळाली, यांत असं दाखवण्यात आले आहे की, सायली किचनमध्ये काम करत असताना तिला चक्कर येते, शिवाय उलटीही होते. त्यानंतर असं दाखवलं आहे की, कल्पना अर्जुन-सायलीला मिठाई भरवते आणि सांगते की ते आई-बाबा होणार आहेत. हे ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते.