‘ठरलं तर मग’ या मालिकेत नवनवीन ट्विस्ट आल्यामुळे ही मालिका रंजक होत चालली आहे. मालिकेत सध्या अर्जुन व सायली यांचे चांगले दिवस आले असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रताप यांच्यावरील आरोप खोटे सिद्ध करत अर्जुनने कोर्टाची केस जिंकलेली असते. तर अर्जुनला या सगळ्यात सायली मदत करते. अर्जुन कुटुंबीयांसमोर सायलीने मदत केल्याचं सांगतो. तर अर्जुन महीपतला जेलची हवा खायला पाठवतो. सायलीने प्रताप यांना सोडवण्यात मदत केली असल्याने सगळेचजण तिच्यावर खूप खुश असतात. तर नेहमीच राग राग करणाऱ्या पूर्णा आजींचाही सायलीवरील राग येत्या भागात निवळलेला पाहायला मिळणार आहे. (Tharal Tar Mag Serial Update)
मालिकेच्या आजच्या भागात सायली किचनमध्ये काम करत असताना पूर्णा आजी तिला बोलावून घेतात. त्यांनतर त्या प्रतापला सोडवण्यासाठी धडपड केल्याबद्दल तिचे आभार व्यक्त करतात. तेव्हा सायली मोठ्या मनाने म्हणते की, “आपल्याच माणसांसाठी काही केलं तर यात आभार मानायचे नसतात. आणि बाबा माझे वडील आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी मी हे केलं तर यात काहीच वावगं नाही”.
यावर पूर्णा आजी म्हणते की, “आताच्या जगात इतकं निस्वार्थपणे कोणीच काही वागत नाही. पण तू आम्हाला दरवेळी तुझ्यातले चांगले गुण दाखवून देतेस”. यावर सायली असं काही बोलते ज्याने पूर्णा आजीला तिच्या मुलीची आठवण येते. त्यानंतर त्या सायलीला म्हणतात, “तुझ्यात फक्त एकच दोष आहे ते म्हणजे तू तन्वी नाहीस. मी प्रतिमाला शब्द दिला होता की या घरची सून फक्त तन्वी होईल. त्यामुळे तू या घरात तन्वीची जागा कधीच घेऊ शकत नाहीस”.
मालिकेच्या आजच्या भागात सुभेदारांच्या घरात आभार प्रदर्शन चालू असलेलं पाहायला मिळतंय. पूर्णा आजी व कल्पना सायलीचे कौतुक तर करतात तसेच सुभेदारांच्या रितीप्रमाणे एखाद्याचे आभार मानताना भेटवस्तू देतात त्याप्रमाणे तिला एक साडी भेटवस्तू म्हणून देतात. पूर्णा आजीने दिलेली स्वतःची साडी सायलीसाठी लाखमोलाची असते. ती खूप खुश होते आणि पूर्णा आजीच्या पाया पडते. बाहेर उभी राहुन गुपचूप सर्व पाहणारी अस्मिता मात्र पूर्णा आजीच्या वागण्याने चकित होते.