rubina dilaik family and twin daughters : हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. ब्यास नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने कुल्लू-मनाली महामार्ग चक्क वाहून गेला आहे, ज्यामुळे वाहतूकीला मोठा फटका बसला आहे. नदीकाठच्या हॉटेल आणि इमारतींना धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हिमाचल प्रदेशसह, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या शहरांनाही मोठा फटका बसला आहे. दरम्यान, पावसाचे आक्राळविक्राळ रुप पाहायला मिळत असून अनेक कुटुंब यांत अडकले आहेत. गेले तीन चार दिवस तिथे वीज खंडित आहे. शिवाय नेटवर्कचाही मोठा प्रॉब्लेम सुरु आहे. यांत एका सेलिब्रिटी कपलचे कुटुंबही अडकले. अभिनेत्रीने याबाबत व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.
हे सेलिब्रिटी कपल म्हणजे अभिनेत्री रुबिना दिलैक आणि अभिनेता अभिनव शुक्ला. रुबिना ही मूळची हिमाचल प्रदेशची आहे. तिचे आई-बाबा, आजी आणि आता तिच्या जुळ्या मुलीही हिमाचल प्रदेशलाच राहतात. सध्या रुबिना आणि अभिनव कामानिमित्त बाहेर आहेत. अशातच पावसाने घातलेल्या थैमानाने तिचे आई, बाबा आणि तिच्या जुळ्या मुली या हिमाचल प्रदेशलाच अडकल्या आहेत. हवामानामुळे फ्लाईट सतत रद्द होत असल्याने रुबिना व अभिनवलाही मुलींपर्यत पोहोचता येत नाही आहे.
अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “चार दिवसांपासून माझंच कुटुंब हिमाचलमधील आमच्या फार्म हाऊसवर आहे. माझे आई-वडील, माझ्या दोन्ही मुली आणि आजी एवढेच तिथे राहत आहेत. तीन दिवसांपासून फार्म हाऊसवर वीज नाही. नेटवर्क नाही. सगळे सुरक्षित आहेत; पण ज्या परिस्थितीतून ते सगळे जात आहेत. त्यावर आपण फक्त प्रार्थनाच करु शकतो. मला इथे बसल्या बसल्या सतत चिंता लागलेली असते. दोन आठवड्यांपासून मी आणि अभिनव आमची फ्लाईट रिशेड्युलवर रिशेड्यूल करीत आहोत; पण आम्हाला तिथे पोहोचण्याची संधीच मिळत नाही आहे. १५ दिवसांपूर्वी जेव्हा मी गेले होते तेव्हा मी स्वतः तीन दिवस अडकले होते”.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’च्या सेटवर जुईची आवडती व्यक्ती कोण?, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “आम्ही दोघी…”
पुढे ती म्हणाली, “हिमाचल, पंजाबमध्ये जी परिस्थिती आहे, त्यात अनेक लोक कठीण परिस्थितून जात आहेत हे मी समजू शकते. मी देवाकडे फक्त प्रार्थना करु शकते की, सगळ्यांना सुरक्षित ठेव. सोशल मीडियावरुन जर फंड गोळा करायचा असेल, तर तेही मी करेन. मला हेच सांगायचं आहे की, मी आणि माझं कुटुंबही या परिस्थितीचा सामना करीत आहे. आपण या नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडू आणि सगळे सुरक्षित राहू दे हीच प्रार्थना. ज्यांचं नुकसान झालं आहे, त्या कुटुंबांबद्दल मला सहानुभूती आहे”.





