मराठीतील देखणा, रुबाबदार अभिनेता म्हणून रवींद्र महाजनी यांची लोकप्रियता ही सर्वश्रुत होती. रवींद्र महाजनी यांच्या अचानक आलेल्या मृत्यूच्या बातमीने साऱ्यांनाच धक्का बसला होता. रवींद्र यांच्या निधनाच्या वेळी त्यांचे कुटुंबीय त्यांच्या जवळ उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना चाहत्यांनी बरंच ट्रोल केलं. अशातच रवींद्र यांची पत्नी माधवी महाजनी यांनी ‘चौथा अंक’ हे पुस्तक प्रदर्शित झाले. या पुस्तकात माधवी यांनी रवींद्र यांच्याबद्दलचे अनेक खुलासे केले आहेत.
‘चौथा अंक’ या पुस्तकात माधवी यांनी रवींद्र यांच्याबद्दलचे अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. रवींद्र यांना दारू, जुगारसारखे व्यसन असून रवींद्र हे माधवी यांच्यावर संशय घेत असल्याचेही त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे. अशातच रवींद्र हे माधवी यांना मारत असल्याविषयीही भाष्य केले आहे.
माधवी यांनी त्यांच्या ‘चौथा अंक’ पुस्तकात या प्रसंगाबद्दल असं म्हटलं आहे की, “एकदा माझी नणंद, तिचे यजमान आणि आम्ही दोघं बाहेर जेवायला गेलो, गप्पा मारत छान जेवण झाले, आम्ही दोघे थोडे पुढे आणि मागून ते दोघे असे आम्ही तिथून निघालो. रवीला काय झालं कळलं नाही, तो अचानक रस्त्यातच मला मारू लागला. आमचं काही भांडण झालं नव्हतं, वाद नाही; त्यानं थेट मारहाण सुरू केल्यावर आम्ही गोंधळून गेलो.
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “माझी नणंद आणि तिचे यजमान यांनी मध्ये पडून माझी रवींद्र पासून सुटका केली आणि आम्ही घरी आलो. येताना त्या दोघांना घरी सोडलं. पुढे निघाल्यावर पुन्हा त्याची मारहाण चालू झाली. याही वेळी मी पुन्हा गाडीतून मध्येच उतरले. त्यानंही गाडी थांबवली. तिथून रवीनं सुरू केलेलं बांधकाम ‘स्वरूप पार्क’ नावाचं कॉम्प्लेक्स होतं; तिथं मी गेले. वॉचमन ओळखीचा होता. त्यानं मला एका फ्लॅटचं दार उघडून दिलं. त्यानेच तिथली एक जुनी कॉट दिली त्यावरच मी ती रात्र काढली आणि सकाळी उठून घरी गेले”.