लोकप्रिय मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या आकस्मिक मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला होता. त्यांच्या अकस्मात निधनावर सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र त्यांच्याबद्दलच्या अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं आता समोर येत आहेत. रवींद्र यांच्या पत्नी माधवी यांचं ‘चौथा अंक’ हे पुस्तक नुकतंच प्रदर्शित झालं असून या पुस्तकात त्यांनी रवींद्र यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच त्यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत.
या पुस्तकात रवींद्र यांनी रागाच्या भरात त्यांची मुलगी रश्मीला मारले असल्याचे म्हटले आहे. माधवी यांनी हा प्रसंग सांगत असे म्हटले आहे की, “रवीला राग आला की तो उग्र रूप धारण करीत असे. प्रेमात आला की तो लाडही खूप करीत असे. एकदा तो रश्मीवर कशावरून तरी इतका चिडला की, त्याने रश्मीचं डोकं भितीवर जोरात आपटलं. तेव्हा तिला कशीतरी त्याच्या तडाख्यातून सोडवले. पण एकूण रवीच्या निष्ठुरपणे मारहाण करण्याच्या सवयीमुळे रश्मीच्या मनात त्याची भीती बसलेली होती.”
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “एकदा आम्ही सर्वजण गप्पा मारत बसलो होतो. रश्मी आतून पाण्याचा ग्लास घेऊन येत होती. अचानक तिच्या हातातून ग्लास निसटून खाली पडला. त्यामुळे तो ग्लास फुटला आणि त्याच्या काचा सर्वत्र विखुरल्या. ग्लास पडल्यामुळे बाबा रागावला तर या भीतीने ती धावत माझ्याकडे आली. पण वाटेत फुटलेल्या काचा होत्या, त्याचे तिला भान राहिले नाही. त्या काचा तिच्या पायात खोलपर्यंत घुसल्या. ताबडतोब तिला आम्ही डॉक्टरांकडे नेले. पाय हळूहळू बरा झाला; पण तिच्या मनातला धाक तसाच राहिला.”
यापुढे त्यांनी रवींद्रंचे कौतुकही केले आहे. त्यांचे कौतुक करत असे म्हटले की, “मूड असला की रवी आमचे लाडही करायचा. रश्मीला पाच वर्षे पूर्ण झाली तेव्हा त्याने तिला जरीचं परकर पोलकं, डोक्यावर मुकूट, कंबरपट्टा व फुलांचे दागिने असा सगळा थाट केला होता. रश्मी तेरा वर्षांची होईपर्यंत तिचा वाढदिवस तो लग्नासारखा साजरा करीत असे. मुलांना, नातेवाईकांना बोलवायचे, ह्या सर्वांवर पैसे खर्च करायचे. महागड्या हॉटेलमधे न्यायचा, भरपूर कपडे, खाण्यापिण्याची चंगळ अशी सगळी त्याची मनमानी चालत असे.”