‘पारू’ या मालिकेत रंजक वळण आलेलं असताना आता पारूच्या जीवाला धोका असण्याची शक्यता समोर आलेली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची मालिकेबाबतची उत्सुकता आणखीनच वाढून राहिलेली पाहायला मिळत आहे. मालिकेत अहिल्यादेवी त्यांचं व्रत पूर्ण करण्यासाठी उपवास धरतात, मात्र या उपवासाचं पूर्णत्व हे २१ पाण्याचे हांडे नदी काठापासून मंदिरात घेऊन जाईपर्यंत असतात. ही कठीण परीक्षा आता अहिल्या देवींना पार करावी लागणार आहे. सगळेजण मंदिराकडे जमलेले असतात तेव्हा उन्हाच्या झळा सर्वांना लागत असतात. दरम्यान पारू सगळ्यांसाठी लिंबू सरबत बनवून आणून देते. त्यावर सगळेजण खुश होतात. (Paaru Serial Update)
पारू तिथून जात असताना काही मुलं तिथे शंख वाजवण्याचा प्रयत्न करत असतात मात्र त्यांना काही जमत नाही त्यावर पारू म्हणते तुम्हाला जमत नाही शंख वाजवायला द्या मी वाजवून दाखवते. पारू भर दुपारच्या वेळी शंख वाजवते त्यामुळे गुरुजींचा अध्ययन तुटण्याची दाट शक्यता असते, असं दुसरे गुरुजी येऊन सांगतात. आणि ते पारुला चांगलंच ओरडतात. त्यावर अध्ययन करणारे गुरुजी बाहेर येत पारूला आशीर्वाद देतात आणि सांगतात की देव तुझं भलं करो. हे ऐकून सगळेचजण चकित होतात. पारूला खुद्द अध्ययन करणाऱ्या गुरुजींचा आशीर्वाद मिळाल्याने ही खूप मोठी भाग्याची गोष्ट असते. पण देव बरे करो असा आशीर्वाद त्यांनी का दिला हा प्रश्न मात्र तसाच असतो. त्यानंतर अहिल्यादेवी नदीकाठी जाऊन ओल्या वस्त्राने हांडे मंदिरात घेऊन जाण्यासाठ तयार असतात.
त्यावेळेला अहिल्यादेवींचे पाय जमिनीवर उष्णतेने भाजू नयेत म्हणून पारू स्वतः कळशीने त्यांच्या पायापुढे पाणी ओतत असते आणि अहिल्यादेवी चालत असतात. मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की,अहिल्यादेवींनी पाणी भरून आणलेल्या हंड्यातून नाग वर येतो आणि पारू त्याला बघताच ती खूप घाबरते. तो नाग अहिल्यादेवींच्या हंड्यातून वर येत त्यांच्या हाताला दंश करतो, त्यानंतर पारू अहिल्यादेवींना धीर देते आणि स्वतःची कळशी फेकून देत पारू अहिल्यादेवींचा हात जवळ घेते आणि नागाने दंश केलेल्या भागातील विष स्वतःच्या तोंडाने खेचून ते विष फेकून देते.
अहिल्यादेवी पारूच्या या हिमतीने आणि मदतीने हे व्रत पूर्ण करू शकतात. त्यानंतर अहिल्यादेवी व्रत पूर्ण झाल्यानंतर पारूला प्रसाद घेऊन जातात आणि म्हणतात की, तुझ्यामुळे आज माझं हे व्रत पूर्ण होऊ शकलं. पारू प्रसाद घेणार इतक्यात तिला चक्कर येऊन ती खाली पडते. आता अहिल्यादेवींचा व्रत पूर्ण करून अहिल्यादेवींचा जीव वाचवून पारूने स्वतःचा जीव धोक्यात टाकला आहे, आता पारूच्या जीवाचं काही बरं वाईट होईल का?, मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.