छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, या रिऍलिटी शो मधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला विनोदवीर म्हणजे अभिनेता ओंकार भोजने. विनोदाचं अचूक टायमिंग जुळवत ओंकार भोजनेने कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील त्याची गौरव मोरे, वनिता खरात, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, शिवाली परब यांसह सर्वच कलाकारांबरोबरचे प्रहसन चांगले गाजले.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाकडे केवळ एक कार्यक्रम म्हणून नव्हे, तर कुटुंब म्हणून पहिलं गेलं असल्याची प्रतिक्रिया कायमच कलाकारांनी व्यक्त केल्या आहेत. मात्र अभिनेता ओंकार भोजनेने या शोमधून काही दिवसांपूर्वी ब्रेक घेतला. त्यामुळे हास्यजत्रेच्या या कुटुंबातून ओंकार भोजने या एका सदस्याची एक्झिट झाल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांची नाराजी व्यक्त केली होती.
ओंकारने नुकतीच हास्यजत्रेतील प्रत्येक कलाकारांबरोबर संपर्कात असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ओंकारने नुकताच ‘इट्स मज्जा’बरोबर संवाद साधला. यावेळी त्याला ‘हसताय ना, हसायलाच पाहिजे’ या शोवर हास्यजत्रेमधील कलाकारांची काय प्रतिक्रिया होती असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत त्याने असं म्हटलं की, “सध्या त्यांचेही शोज आणि शूटिंग सुरु आहे. त्यामुळे जे जे आपापल्या कामात जास्तच व्यस्त आहेत त्यांच्याबरोबर आता बोलणं नाही झालं. पण आता या शोचे एपिसोड जसे जसे येतील. तेव्हा ते बघतील आणि त्यानंतर ते नक्कीच मला त्यांच्या प्रतिक्रिया सांगतील”.
यापुढे त्याने असं म्हटलं की, “एपिसोड्स पाहिल्यानंतर हे सगळेच असं कर, तसं कर म्हणून सांगतील. तर त्यांनी हे बदल सुचवणे हे एक टीम व कुटुंब म्हणून कायमच राहील. जर प्रेक्षक खूप लांबूनही मला प्रतिक्रिया देत असतील तर यांच्याबरोबर मी एकत्रच राहिलो आहे आणि खूप वेळ एकत्र घालवला आहे. त्यामुळे ते जे जे काय सांगणार ते ते मी नक्कीच ऐकणार.” दरम्यान, ओंकारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून एक्झिट घेतल्यानंतर ओंकारने अनेक विनोदी कार्यक्रमांद्वारे मनोरंजन केले आणि अशातच तो आता ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या शोमधून प्रेक्षकांना हसवण्याचे काम करत आहे.